शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपाशी जुळवून घेण्यासाठी एक पत्र शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलं आहे. या पत्रानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेमधूनच भाजपासोबत पुन्हा युती करण्यासाठी मागणी केली जात आहे. काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे आधीच महाविकासआघाडीच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केलं जात आहे. त्यात प्रताप सरनाईक यांच्या या ‘लेटरबॉम्ब’मुळे ते प्रश्नचिन्ह अधिकच मोठं झाल्याचं दिसू लागलं आहे. त्यावर भाजपाची नेमकी काय प्रतिक्रिया येते याकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागून होतं. अखेर भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची यावर प्रतिक्रिया आलेली नाही.

भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी मोजक्या शब्दात बातमी ट्विट करत ‘रामप्रसाद’ असं लिहिलं आहे. त्यामुळे आता भाजपा आणि शिवसेनेत काय चाललंय याचा अंदाज बांधणं कठीण झालं आहे. राममंदिरावरून सुरु असलेल्या वादाची याला किनार असल्याचं या ट्वीटमधून जाणवत आहे.

चार दिवसांपूर्वी राम मंदिरावरुन शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेमुळे हा वाद झाला होता. त्यानंतर मुंबईत शिवसेना भवनसमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली होती. अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेकडून टीका करण्यात आली होती. शिवसेनेकडून घेण्यात आलेल्या भूमिकेविरोधात भाजपा जनता युवा मोर्चाकडून शिवसेना भवनच्या बाहेर आंदोलन केलं होतं.

“संबंध अजून तुटण्याआधी भाजपाशी जुळवून घ्यावं”, शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचं उद्धव ठाकरेंना पत्र!

दुसरीकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “या परिस्थितीमधे जे राजकारण सुरू आहे, त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असतील, आपला पक्ष कमकुवत करत असतील, तर या स्थितीत मला पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल”, अशी थेट मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे.