कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी मतदान केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो आहे. आठवी पास असूनही त्यांनी मतदान केल्याने वाद निर्माण झाला. मात्र आता विरोधकांनी केलेल्या आरोपांवर नरेंद्र मेहतांनी उत्तर दिलं आहे. तसंच आठवी पास असल्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे.

नेमकं काय घडलं?

नरेंद्र मेहता यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता त्यामध्ये त्यांच्या बोटावर मतदानाची शाई दिसत आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना मेहता यांनी म्हटले की, पदवीधर निवडणुकीवेळी उजव्या हातावर शाई लावली जाते. मी पोस्ट केलेल्या फोटोत माझ्या बोटावर मतदानाची शाई दिसते आहे, मात्र ती शाई डाव्या हाताच्या बोटावर होती, ही शाई लोकसभा निवडणुकीवेळी लावण्यात आली होती, असे नरेंद्र मेहता यांनी संगितलं. तसंच आपण आठवी पास आहोत याचा आपल्याला अभिमान आहे असंही त्यांनी म्हटलं.

हे पण वाचा- माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या छायाचित्रामुळे खळबळ, ८ वी उत्तीर्ण असूनही पदवीधर मतदार संघात मतदान कसे?

संजय राऊत म्हणाले भाजपाने नरेंद्र मेहता पॅटर्न

नरेंद्र मेहतांवर पदवीधरसाठी मतदान केल्याचा आरोप झाल्यानंतर संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. “नरेंद्र मेहता पॅटर्नने भाजपाने लोकसभेच्या जागा जिंकल्या. खोटारडेपणा, यंत्रणा ताब्यात घेणं, बोगस मतदान, ईव्हीएम घोटाळे केले. नरेंद्र मेहता पॅटर्नने ७० ते ८० जागा जिंकल्या.” असा आरोप संजय राऊत यांनी नरेंद्र मेहतांनी केला. नरेंद्र मेहता हे मीरा भाईंदरचे माजी आमदार आहेत.

नरेंद्र मेहतांचं स्पष्टीकरण नेमकं काय?

“काही माध्यमांमधून माझी बदनामी केली जात आहे. पदवीधर मतदारसंघाचं मततदान होतं त्यावेळी कार्यकर्त्यांसोबत फोटो काढताना ती पोझ दिली होती. मी मतदान केलंय असा दावा मी कुठेही केला नाही. पदवीधर मतदारसंघाचं मतदान करताना बोटाला शाई उजव्या हाताला लावली जाते आणि मी मतदानास प्रोत्साहित करण्यासाठी कार्यकर्त्यासोबत डावा हात दाखवत होतो. मला अभिमान आहे मी आठवी पास असल्याचा, मी दोन हजार जणांना नोकऱ्या दिल्या आहेत.” असं आता या आरोपांवर नरेंद्र मेहतांनी म्हटलं आहे.

“बुधवारी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होती. निवडणुकीवेळी आम्ही अनेकदा फोटो पोस्ट करत असतो. एका पत्रकाराने बातमी दिली की, मी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान केलं. मात्र ही बातमी अपुऱ्या माहितीवर दिली गेली. पदवीधर निवडणुकीत शाई ही डाव्या नव्हे तर उजव्या हातावर लावली जाते. या निवडणुकीत मतदान करायला निवडणूक यादीत तुमचे नाव असणे गरजेचे असते. माझी बदनामी करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मी एरवी बोलत नाही, पण लोकांमध्ये गैरसमज पसरु नये म्हणून बोलावे लागत आहे.” असं म्हणत त्यांनी त्यांच्यावर होणारे आरोप फेटाळले.