राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेनेचा ठाकरेगट आणि शिंदेगटासह भाजपा आणि इतर राजकीय पक्षांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली करायला सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जोर लावला आहे. ठाकरेगट आणि भाजपाकडून एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

मुंबईतील सर्व सोयीसुविधा गुजरात पळवून नेण्याचा डाव भाजपाचा आहे, अशी टीका ठाकरेगटाकडून करण्यात येत आहे. मुंबईतून सगळं गुजरातला नेलं जातंय, या सेनेच्या टीकेचा भाजपा नेते आशिष शेलार यांनी समाचार घेतला आहे. त्यांनी शिवसेनाचा उल्लेख पब, पेग आणि पार्टीवाली पेंग्विन सेना असा केला आहे. त्यांनी ट्वीट करत ही टीका केली आहे.

हेही वाचा- “रामदास कदमांसारखा कृतघ्न माणूस…” दसरा मेळाव्यावरून भास्कर जाधवांची बोचरी टीका

शेलारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “देशातील सर्वात जुने विशेष आर्थिक क्षेत्र असलेल्या अंधेरीच्या सिप्झमध्ये भारत सरकारकडून २०० कोटी रुपये खर्च करून विशेष केंद्रीकृत सुविधा (सीएफसी) उभारण्यात येत आहे. याच्या माध्यमातून ५ लाख रोजगार आणि ३० हजार कोटींच्या निर्यातीचे उदिष्ट ठेवण्यात आलं आहे. याची नुकतीच पायाभरणी झाली आहे.”

अन्य एका ट्वीटमध्ये त्यांनी पुढे म्हटलं की, “बीकेसीत भूमिगत बुलेट ट्रेन टर्मिनस आणि त्यावर आयएफएससी उभे राहणार आहे. सोबतच ७ मेट्रो धावू लागतील. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आर्थिकदृष्ट्या बलवान होणार! आमचं ठरलंय! पण पब, पेग आणि पार्टीवाल्या पेंग्विन सेनेला मुंबईतून सगळे गुजरातला जाते, असे ध्वनिप्रदूषण करण्याची नशाच चढलीय” अशी टीका आशिष शेलारांनी केली आहे.