Ashok Chavan : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या सर्वच राजकीय पक्षाचे नेते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघाचा आढावा घेत आहेत. त्यातच एकीकडे महायुतीच्या नेत्यांचे दौरे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दौरे असं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. या दौऱ्यांच्या माध्यमातून नेते मंडळी मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. तसेच निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणीही करत आहेत. तसेच निवडणुकीच्या आधी सभा आणि मेळाव्यांचाही धडाका सुरु आहे. या सभा आणि मेळाव्यांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशातच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या समीकरणामुळे निवडणूक लढवण्याची इच्छा असणारे काही नेते पक्षांतर करतानाही पाहायला मिळत आहेत. या अनुषंगानेच माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे भाजपासोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. भास्करराव पाटील खतगावकर यांनी या संदर्भात काही दिवसांपूर्वी सूचक विधानही केलं होतं. दरम्यान, त्यांच्या काँग्रेसमध्ये जाण्याच्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी भास्करराव पाटील खतगावकर यांना इशारा दिला. “आमच्याबरोबर राहिले तर सुरक्षित राहतील”, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी खतगावकरांना इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावरही भाष्य केलं.

हेही वाचा : “ते पक्ष सोडून गेले, त्यांच्या पत्नी देखील निवडून आल्या नाही”, गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका

खतगावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे देखील भाजपात दाखल झाले होते. मात्र, आता भास्करराव खतगावकर हे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. भास्करराव खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांमुळे अशोक चव्हाणांसाठी धक्का मनला जात आहे. यातच आज माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी सूचक विधान केलं आहे. “आमच्याबरोबर राहिले तर सुरक्षित राहतील”, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी नाव न घेता भास्करराव खतगावकर यांना इशारा दिला आहे.

मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबत अशोक चव्हाण काय म्हणाले?

“मला वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांना उपोषण न करण्याची विनंती केली आहे. मनोज जरांगे यांनी केलेल्या अनेक मागण्यासंदर्भात बरंच काम झालेलं आहे. तसेच समन्वयामधून मार्ग निघेल. आता १० टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे. काही जणांना कुणबी प्रमाणपत्रही देण्यात आलेली आहेत. त्या १० टक्क्यांमध्ये काही जणांना नोकऱ्या देखील लागलेल्या आहेत. अशा प्रकारे आतापर्यंत खूप काम झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की उपोषणाचा मार्ग न स्वीकारता समन्वयामधून प्रश्न सोडवण्याची भूमिका सरकारची आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी देखील प्रतिसाद द्यायला हवा. त्यामध्ये माझी देखील समन्वयाचं काम करण्याची भूमिका आहे. मी त्यांच्याशी संपर्क देखील करेन आणि उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न करेन”, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader ashok chavan on bhaskarrao khatgaonkar patil nanded politics congress gkt