विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, आशीष शेलार आदी नेते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश राज्यपालांनी द्यावे, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली असून त्याबाबतचं एक पत्र राज्यपालांना देण्यात आलं आहे.

या पत्रात मांडलेले महत्त्वाचे मुद्दे असे :

  • भाजपा-शिवसेनेने एकत्रितपणे निवडणुका लढवल्या होत्या. परंतु निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले.
  • शिवसेनेत गेल्या ८-९ दिवसांपासून अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे आणि त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आता आघाडी नको आहे. शिवसेनेचे ३९ आमदार ही आघाडी संपुष्टात येण्याच्या बाजूने आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बहुमत गमावले आहे.

दुसरीकडे, शिवसेनेच्या या आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यांचे ४० मृतदेह गुवाहाटीतून परत येतील, असे जाहीरपणे राज्यसभा सदस्य संजय राऊत सांगत आहेत. शिवाय शिवसेनेचे इतरही नेते अशाच प्रकारची धमकीयुक्त भाषा वापरत आहे. यासंदर्भात सर्व पुरावे सोबत जोडले आहेत.

  • संसदीय लोकशाहीत सभागृहातील बहुमत ही सर्वोच्च बाब असल्याने आणि त्याशिवाय, ते सरकार अस्तित्त्वात राहू शकत नसल्याने तातडीने मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशीविनंती भाजपानं राज्यपालांकडे केली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे विविध दाखले सुद्धा देण्यात आले आहेत.

Story img Loader