भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करतात. आता पुन्हा एकदा पडळकरांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. दलित चळवळ मोडून काढण्याचं काम एकाच नेत्यानं केलं, अशी अप्रत्यक्ष टीका पडळकरांनी केली आहे. ते आटपाडी येथे फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच आयोजित ‘भारतीय संविधान जनजागृती सप्ताह’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

शरद पवारांना अप्रत्यक्ष लक्ष्य करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “या महाराष्ट्रात बहुजन-बहुजन म्हणत अनेक लोकांनी स्वत:चा उद्धार केला. बहुजनांचं नाव घ्यायचं आणि बहुजनांच्या विरोधात काम करायचं, बहुजनांचं नाव घ्यायचं आणि बहुजनांना एकत्रित येऊ द्यायचं नाही. बहुजनांचं नाव घ्यायचं आणि दलितांच्या सगळ्या चळवळी मोडून काढायच्या, हे काम कुणी केलं? तो एकच माणूस आहे. हे काही राजकीय व्यासपीठ नाही, त्यामुळे मी राजकारणावर बोलणार नाही.”

हेही वाचा- “पवार ज्याला हात लावतात, त्याची राख होते” बारामतीचा कथित जाणता राजा म्हणत पडळकरांची खोचक टीका!

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे तुकडे-तुकडे करण्यामध्ये सर्वात मोठा सहभाग कुणाचा आहे? ते सांगा मित्रांनो. कारण त्यांना माहीत होतं, या चळवळी मजबूतपणे उभ्या राहिल्या तर आपल्या पोरांना आमदार, खासदार किंवा मुख्यमंत्री करता येणार नाही. या चळवळी आणि संघटनांमुळे ही व्यवस्था आपल्याला उपभोगता येणार नाही. म्हणून या चळवळीमध्ये फूट पाडली” अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे.

Story img Loader