जालना येथील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. त्यांच्या मनधरणीसाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करतं आहे. या आंदोलनामुळे मराठा आरक्षण हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिलं. तसंच निजामकाळातली कागदपत्रं ज्यांच्याकडे आहेत त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र दिलं जाईल अशीही घोषणा त्यांनी केली. या प्रकरणी आता पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. काय म्हणाल्या पंकजा मुंडे? "मी वेळोवेळी हा विषय मांडला आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. त्यासाठी अभ्यासगट स्थापन करुन योग्य त्या प्रमाणात त्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर इतर गोष्टी येतात. कुणीही घोषणा करुन, वक्तव्य करुन मराठा आरक्षण मिळणार नाही. मराठा आरक्षण न्यायिक, संविधानिक प्रक्रियेवर टिकणारं असलं पाहिजे" असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मराठा आरक्षण दिलं गेलंच पाहिजे, विद्वान अभ्यासक गटाची समिती त्यासाठी स्थापन झाली पाहिजे, यात राजकीय हस्तक्षेप नसावा. मराठा समाजाला विश्वासात घेऊन आरक्षण दिलं गेलं पाहिजे असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. हे पण वाचा- “जेजुरीला पहिल्यांदाच आले आणि…”, काठी आणि घोंगडं देऊन सत्कार झाल्यावर भारावल्या पंकजा मुंडे पंकजा मुंडे या राज्यभरातल्या देवस्थानांमध्ये शिवशक्ती परिक्रमा यात्रा करत आहेत. आज सकाळी त्या कोल्हापुरात होत्या. त्यानंतर त्या सांगलीत गेल्या, सांगलीतल्या देवस्थानांचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांनी त्यांना मराठा आरक्षणाविषयी विचारलं असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांनी टीका केली. हे पण वाचा- ..आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी फिरवली भाकरी! शिवशक्ती परिक्रमा दौऱ्यात आदिवासी महिलांशी संवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं होतं? मी मनोज जरांगे पाटील यांना विनंती करतो आहे की त्यांनी सुरु ठेवलेलं उपोषण आंदोलन मागे घ्यावं. आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणारच आहोत. आता मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेऊन सरकारला सहकार्य करावं. टिकणारं मराठा आरक्षण देईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हा मी शब्द मनोज जरांगे पाटील आणि संपूर्ण मराठा समाजाला देतो आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं.