Pankaja Munde : हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. हर्षवर्धन पाटील भाजपात नाराज असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. ते भाजपा सोडणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण त्यांनी हा पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला धक्का बसला आहे. हर्षवर्धन पाटील यांचा निर्णय वैयक्तिक आहे. पण त्यांनी पक्ष सोडायला नको होता असं पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) म्हणाल्या आहेत.

हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?

“जनतेचा आवाज एकच आहे मी निवडणूक लढवली पाहिजे. मी शरद पवारांना भेटलो त्यांनीही मला सांगितलं की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. शरद पवारांनी मला विचारलं तुम्ही काय निर्णय काय निर्णय घेणार? तुम्ही भाजपात आहात. त्यावर शरद पवार म्हणाले की जनतेचा आग्रह आहे तर तुम्ही निर्णय घ्या. बाकी गोष्टीची काळजी मी घेईन.” असं हर्षवर्धन पाटील इंदापूरमधल्या कार्यक्रमात म्हणाले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात जात असल्याचं जाहीर केलं. इंदापूर या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांनी जे भाषण केलं. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचं ना? असा प्रश्न विचारला त्यावर उपस्थितांनी हो अशी घोषणा दिली. तसंच रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशा घोषणाही दिल्या. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात त्यांनी प्रवेश घेण्याचा निर्णय जाहीर केला. याबाबत पंकजा मुंडेंची ( Pankaja Munde ) प्रतिक्रिया आता समोर आली आहे.

हे पण वाचा- ‘भाजपात आल्यावर शांत झोप लागते’ म्हणणाऱ्या हर्षवर्धन पाटलांचा पक्षाला ‘राम राम’; म्हणाले..

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

हर्षवर्धन पाटील यांनी पक्ष सोडायला नको होता. त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. पण त्यांनी पक्ष सोडायला नको होता, त्यांनी निर्णय घेतला आहे. आता त्याबाबत काय बोलणार? माझे आणि त्यांचे वैयक्तिक पातळीवर अतिशय चांगले संबंध आहेत. त्यांनी आमच्या प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली त्यानंतर निर्णय घेतला. पण त्यांनी असा निर्णय घ्यायला नको होता असं पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) म्हणाल्या.

पुण्यातल्या बोपदेव येथील घटनेबाबतही भाष्य

पुण्यातल्या बोपदेव भागात मुलीवर सामूहिक बलात्कार झाला ही घटना अत्यंत घाण अशी ही प्रवृत्ती आहे. या विकृतांना शिक्षा व्हायला पाहिजे. समाजात विकृती वाढत चालली आहे, कायद्याचा वचक असलाच पाहिजे. पण विकृतीला कायद्याने कसं घाबरवणार? महिलांचा आदर करणं, सन्मान करणं या गोष्टी पुढच्या पिढीला शिकवल्या गेल्या पाहिजेत असं पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) म्हणाल्या.