राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या विधानवरुन वाद शमत नाही तोपर्यंतच जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या नव्या वक्तव्यावरुन पुन्हा वाद पेटताना दिसत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काल रात्री ट्विटरवर भूमिका मांडत असताना औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा नव्हता, असे सांगितले. त्यानंतर भाजपकडून या वक्तव्याचा जोरदार निषेध करण्यात येत आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी देखील या विषयात राष्ट्रवादी काँग्रेसला जाब विचारताना महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला डिवचले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राम कदम म्हणाले की, “राष्ट्रवादीचे नेते म्हणतात औरंगजेब क्रूर नाही. ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांना हलाहल करून अत्यंत निर्दयतेने जीवे मारलं. ज्यांच्या डोळ्यांमध्ये तळपत्या सळ्या घालून डोळे बाहेर काढले गेले, तो औरंगजेब राष्ट्रवादीच्या मते क्रूर नाही? निर्दयतेचे आणखी कोणते उदाहरण राष्ट्रवादी पक्षाला हवे आहे. राष्ट्रवादी पक्षाचे हे सगळं ठरवून चाललेलं आहे.”

पाहा व्हिडिओ

हेही वाचा >> “औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं”, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटण्याची चिन्हं

“औरंगजेबाचा एकाठिकाणी उदो उदो करायचा आणि दुसऱ्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कमी लेखायचे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक गोष्ट लक्षात ठेवावी. या महाराष्ट्राच्या भूमीत उदो उदो हा फक्त संभाजी राजे आणि शिवरायांचा होईल. औरंगजेबाचा कधीच होणार नाही. आमचा सवाल श्रीमान उद्धव ठाकरेंना आहे. जे औरंगजेबांचा उदो उदो करतात त्यांच्यासोबत आपण आणखी किती काळ राहणार?”, असा सवाल उपस्थित करत राम कदम यांनी शिवसेनेला डिवचले.

हेही वाचा >> “सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे स्त्रीलंपट…”, जितेंद्र आव्हाडांचं खळबळजनक ट्वीट

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्यरक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला कुणी दिली? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं. तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आलं. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla ram kadam slams uddhav thackeray over ncp aurangzeb statement kvg