“फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावानं मत मागून, इथल्या वंचित शोषित घटकांच्या भावनांचा खेळ करत सत्ता उपभोगणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने आज दलितांवर पाण्यासाठी पुन्हा सत्याग्रह करण्याची वेळ आणली.” असा आरोप आमदार राम सातपुते यांनी केला.
तसेच, “अमरावतीच्या सावंगी मग्रापुर गावातल्या दलित बहूल वॉर्डात महिनाभरापासून पाणी नाही. गावातील सरपंचांनी हेतूपूरस्पर पाण्याचे कनेक्शन तोडले आहेत. जीवघेण्या थंडीत आमच्या माता-भगिनी गावाच्या वेशीवर ठिय्या आंदोलनास बसल्या होत्या. अनेकांनी गाव सोडून दिलंय. हा फक्त पाण्याचा पुरता विषय नाही. हा सरळ सरळ तुम्ही सामाजिक बहिष्कार घालत आहात. हा मोठा गुन्हा आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेनी या प्रकरणाची दखल घेत समिती स्थापन करून तातडीने चौकशीचे आदेश दिले पाहिजेत.” अशी मागणी देखील आमदार सातपुते यांनी केली आहे.
याचबरोबर, “वंचित घटकाच्या कल्याणासाठी उभारलेली बार्टी संस्थाही लाभ देण्यासाठी सावकारसारखं वागते, बील काढण्यासाठी तुम्हाला पार्ट्या द्यावा लागतात. या संस्था म्हणजे आपल्या जहागिऱ्या नाहीत याचे भान ठेवा. धनंजय मुंडे हा गलथान प्रकार कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे? आघाडीची सत्ता आली की दलित,वंचित, शोषित घटकावर अत्त्याचार वाढतात. ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे. आता लवकरात लवकर संबंधित सरपंच, उपसरपंचावर कारवाई झाली पाहिजे. ”असेही सातपुते म्हणाले आहेत.