Suresh Dhas : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेतील काही आरोपींना अटक करण्यात आलं आहे. मात्र, अजूनही एक आरोपी फरार आहे. तसेच वाल्मिक कराड खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांना शरण आला असून तो कोठडीत आहे. मात्र, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेत वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढून निषेध नोंदवला जात आहे.

आज छत्रपती संभाजीनगरमधील पैठणमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात बोलताना आमदार सुरेश धस यांनी नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. आका आणि आकाच्या आकाचे परळीत वेगवेगळे उद्योग सुरु असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. तसेच पुण्यात आकाकडे ७ शॉप असून आकाच्या गाडी चालकाच्या नावावर १५ कोटींचा इमारतीचा संपूर्ण एक मजला असल्याचा गंभीर आरोप सुरेश धस यांनी पैठणमधील मोर्चात बोलताना केला आहे.

सुरेश धस काय म्हणाले?

“बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी या दोघांच्या बाबतीत अतिशय चुकीचं घडलेलं आहे. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या घरी मी जाऊन आलेलो आहे. परिस्थिती गंभीर आहे. संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळायलाच हवा. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर जो शवविच्छेदन अहवाल आला त्या अहवालामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने मारल्याचं समोर आलं. एवढ्या चुकीच्या पद्धतीने कधीच कोणी मारलेलं नाही. आता हे कसं घडतंय तर हे फक्त आका आणि आकाचा आका यांचे वेगवेगळे उद्योग आहेत, त्यामुळे हे घडतंय”, असं सुरेश धस यांनी म्हटलं.

हेही वाचा : वाल्मिक कराडप्रश्नी सुप्रिया सुळे आक्रमक; ईडी आणि पीएमएलएचा उल्लेख करत थेट केंद्र सरकारला केलं लक्ष्य!

“परळीतील इराणी समाजाचे काही लोक आहेत. हे लोक या दोघांच्या जीवावर गांजा, चरस आणि देशी विदेशी रिव्हालवर विक्री करतात. या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करत होते. थर्मलमधील भंगार दररोज चोरीला जात होतं आणि त्यात पोलिसांचा वाटा आणि पोलिसांच्या वाट्यानंतर आकाचा वाटा होता. एसटी महामंडळातील अनेक लोक एसटीतील काही चोरतील म्हणून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस होते आणि ते पोलीस आकाला जाऊन भेटायचे असा प्रघात परळीत होता”, असा आरोप सुरेश धस यांनी केला.

“अनेकांवर खोट्या अँट्रॉसिटीच्या तक्रारी करायच्या आणि त्यांचं चारित्र्यहनन करायचं. करुणा शर्मा यांच्या गाडीत एका पोलिसाने बंदुक ठेवली होती. त्याच्या बरोबर आणखी दोनजण होते. आका आणि आकाच्या आकाने एखादा पदाधिकारी नेमला तर त्या अधिकाऱ्याने फक्त सयाजीराव व्हायचं. त्यांना काडीचाही अधिकार नसतो. त्यानंतर ते अधिकारी आका आणि आकाच्या इशाऱ्यावर सर्व काही गोळा करण्याचं काम करतात. यांच्या हप्त्याच्या वसुलीला वैतागून एकजण कंपनी विकून निघून गेला. आता मी जे काही आरोप करतो, याचं उत्तर बाहेर असणाऱ्या आकाने द्यावं”, असं आव्हान सुरेश धस यांनी दिलं आहे.

“जर पोलीस दलातील कर्मचारी आका आणि आकाच्या आकाचं ऐकून काम करत असतील तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की, टिव्ही चॅनेलच्या मालिकेतील सीआयडीतील पोलीस आणि सावधान इंडिया मालिकेतील पोलिसांची नियुक्ती परळीला करावी, अशी परिस्थिती परळीत आहे. आता पुण्यातील एफसी रोडवर आकाने सात शॉप बूक केलेले आहेत. यातील एका शॉपची किंमत पाच कोटी आहे. तसेच यातील आठवा शॉप हा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील एका आरोपीच्या बहिणीच्या नावावर आहे. तसेच आकाच्या दुसऱ्या पत्नीच्या नावार तीन शॉप आहेत. पुण्यातील एफसी रोडवर सात शॉप बूक केलेत. तसेच पुण्यातील मगरपट्टा परिसरात एका इमारतीचा १५ कोटींचा एकच संपूर्ण मजला खरेदी केला आहे आणि हा मजला आकाच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे”, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे.

Story img Loader