गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली आहे. इतर बहुजन समाजाताली लोकांना जो न्याय मिळतो तोच मराठा समाजातील लोकांना मिळावा अशी आमची भूमिका आहे असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांनी जी रचना रचली आहे ती आता महाराष्ट्राला लागू होत नाही का? अशी विचारणाही यावेळी संभाजीराजेंनी राजकीय नेत्यांना केली. ते औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
जे राज्याच्या हातात आहे ते राज्याने आणि केंद्राने त्यांच्या हातात आहे ते करावं आणि मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढावा अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. “मी कोणत्याही राजकीय नेत्यांना भेटणं टाळलं आहे. समाजाची अस्वस्थता जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे,” असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. २७ ऐवजी आपण २८ तारखेला भूमिका स्पष्ट करणार असल्याचं यावेळी त्यांनी जाहीर केलं.
“सरकारी दरबारी विषय पोहोचवायचा असेल तर रस्त्यावर आंदोलन करावं लागतं. ५८ मोर्चे काढून हा विषय पोहचवला आहे, सरकारला सर्व गोष्टी माहिती आहे. हे काही खुळं सरकार नाही ना, म्हणूनच ते सरकार झालं आहे. पुन्हा एकदा लोकांना वेठीस धरणं या मताचा मी नाही. मी शिव शाहूंचा वंशज असून सामान्यांची काळजी करणं कर्तव्य आहे. करोना संकट असल्याने लोकांचा जीव धोक्यात घालू शकत नाही. आंदोलन करावं की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. सरकार कोणतीही दखल घेत नसेल तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करावंच लागेल,” असा इशारा संभाजीराजेंनी दिला.
“सरकारच्या हातात अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम जबाबदारी राज्यकर्त्यांची असून त्यात माझ्यासकट खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांची आहे. त्यामुळे समाजाला वेठीस धरु नका. इतर बहुजन समाजातील लोकांना कसा न्याय देत आहात? माझ्यासहित जो श्रीमंत वर्ग आहे त्यांना एक टक्काही मदत देऊ नका. पण जो ३० टक्के गरीब समाज आहे त्यासाठी अपवादात्मक मदत कशी करणार ते सांगा,” अशी मागणी संभाजीराजेंनी केली.
भाजपाने आंदोलनाला पाठिंब्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “मी काही कोणाला सुचवत नाही. मी समाजाचा घटक असून बाजू मांडत असतो. ते काय मांडतात तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांची भूमिका त्यांना विचारा. समाजाची बाजू प्रामाणिकपणे सरकार दरबारी मांडायची ही माझी भूमिका आहे. २००७ पासून मी हे करत असून त्यासाठी मला कोणी आव्हान देऊ शकत नाही. ते काय मांडतात तो त्यांचा दृष्टीकोन आहे”.
“हे काही खुळं सरकार नाही ना…,” मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे संतापले https://t.co/3omTBV3g40 < येथे वाचा सविस्तर वृत्त #Maharashtra #MarathaReservation #MaharashtraGovernment #SambhajiRaje @YuvrajSambhaji pic.twitter.com/kLiO1WTmMu
— LoksattaLive (@LoksattaLive) May 26, 2021
“समाजाला राजकीय अंग देऊ नका असं माझं स्पष्ट आहे. आपल्या भावना मांडण्याचा सर्व राजकीय नेत्यांना अधिकार आहे. पण सध्या राज्यकर्त्यांनी भूमिका मांडणं गरजेचं आहे. एकमेकांना सूचना द्या. तुम्ही समाजासाठी काय करु शकता हे सरकारने आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी राजकारण सोडून सांगावं,” अशी मागणी संभाजीराजे यांनी केली.