सत्ता ही आपली मक्तेदारीच असल्याच्या मानसिकतेतील राष्ट्रवादी नेत्यांना सत्ता परिवर्तनानंतर पंकजा मुंडे पालकमंत्री झाल्याचे दुख आहे. त्यामुळेच मंत्री उशिरा आल्याचे कारण पुढे करीत नियोजन समिती बठकीवर बहिष्कार टाकण्याचे नाटक केले. विरोधासाठी विरोध ही राष्ट्रवादीवाल्यांची वृत्तीच जनभावनेची थट्टा असल्याचा टोला भाजप आमदार आर. टी. देशमुख यांनी लगावला. दरम्यान, पालकमंत्री मुंडे यांनी महत्त्वाच्या विषयांना बगल देत बठक गुंडाळली. त्यांना कोणतेही गांभीर्य नसल्याचा आरोप जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केला. या आरोप-प्रत्यारोपामुळे बैठक बहिष्कार नाटय़ावरून आता राजकीय कलगीतुरा रंगला आहे.जिल्हा नियोजन समिती बठकीला पालकमंत्री मुंडे उशिरा आल्याचे कारण पुढे करीत राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार अमरसिंह पंडित आदींनी बठकीवर बहिष्कार टाकून निघून गेले. त्यानंतर राजकीय वातावरण तापले. राष्ट्रवादीच्या या बहिष्कार बाणानंतर रात्री भाजप आमदार देशमुख यांनी भाजपच्या पंकजा मुंडे पालकमंत्री झाल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना दुख आहे. सत्ता ही आपली मक्तेदारी आहे, अशा मानसिकतेत असलेल्या या नेत्यांना मुंडे मंत्री असल्याचे सहनच होत नाही. यापूर्वी झालेल्या अनेक बठका किती तरी तास उशिराने झाल्या. मागील ३ महिन्यात महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या बठकीचा अपवाद वगळता इतर एकाही बठकीला राष्ट्रवादीचे आमदार फिरकले नाहीत. पंकजा मुंडे यांना अंबाजोगाईहून येताना थोडा उशीर झाला. मात्र, याचे भांडवल करून विरोधासाठी विरोध करण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे हे नाटक जनतेला माहीत आहे, असा आरोप त्यांनी केला. खरे तर जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन बठकीस उपस्थित राहून चर्चा करण्याऐवजी त्यांनी बहिष्कार टाकून निघून जाण्यामागे आणखी एक कारण होते. जिल्हा बँकेतील ठेवीदारांनी पालकमंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अडवून अडकलेल्या ठेवी द्या व दोषी संचालक पुढाऱ्यांना अटक करा, अशी मागणी केली. आमदार असलेल्यांवर बँक प्रकरणात गुन्हे दाखल असल्याने त्यांनी बहिष्काराचे नाटक करून तेथून पळ काढला. हा केवळ आपले राजकीय अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा टोलाही देशमुख यांनी लगावला.जि. प. अध्यक्ष पंडित यांनीही प्रसिद्धीपत्रक काढून नियोजन बठक केवळ सोपस्कार म्हणून उरकण्यात आली. पालकमंत्र्यांना कोणतेही गांभीर्य नव्हते. अनेक महत्त्वाच्या विषयांना बगल देण्यात आली. पुढचे कार्यक्रम असल्याचे सांगत उशिरा सुरू केलेली बठक लवकर गुंडाळली, असा आरोप त्यांनी केला. नियमाप्रमाणे जि. प. ला विकासकामांसाठी निधी मिळाला पाहिजे. अन्यथा न्यायालयाचाही दरवाजा ठोठावू, असा इशाराही पंडित यांनी दिला. आमदार अमरसिंह पंडित यांनीही पालकमंत्र्यांना विधान परिषद विरोधी पक्षनेता, माजी पालकमंत्री व राष्ट्रवादीचे आमदार यांना सामोरे जायचे नसावे, त्यामुळे उशिरा येण्याचा प्रकार केला. वाट पाहून आम्ही सभात्याग केला. मंत्र्यांचे उशिरा येणे बेजबाबदारपणाचे आहे, असा आरोप केला. माजी पालकमंत्री आमदार जयदत्त क्षीरसागर यांनीही आपण वेळेवर १ वाजता बठकीस उपस्थित होतो. पण पालकमंत्री उशिरा येऊनही कार्यकर्त्यांशी चर्चा करीत बसल्या. हा प्रकार विचित्र वाटल्याने आपण सभात्याग केल्याचे स्पष्ट केले.