महाराष्ट्रात आगामी काळात निवडणूक जाहीर होणार आहे. अद्याप या निवडणुकीची तारीख जाहीर व्हायची आहे. मात्र सगळ्याच पक्षांना या निवडणुकीचे वेध लागले आहेत. या दरम्यान काही घटना घडत आहेत ज्यावरुन राजकारण होतं आहे. हे राजकारण महाविकास आघाडीकडून केलं जातं आहे आणि महाराष्ट्रात अराजक माजवण्याचं दिवास्वप्न पाहिलं जातं आहे असा आरोप भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. तसंच मविआचं गणित काय ते देखील त्यांनी सांगितलं आहे.

काय आहे केशव उपाध्येंची पोस्ट?

आज एमपीएससीने परिक्षा पुढे ढकलल्या, पण आंदोलन सुरू ठेवण्यासाठी कारण अगोदरच तयार केले होते, कृषी विभागातील २५८ जागांचे. कारण राज्य लोकसेवा आयोगाचा विषय संपला आता कृषी विभागाशी संबंधित परिक्षेचा विषय राहिला आहे. यातील पदांची संख्या आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बघता यालाही राजकारणाचीच झालर असल्याचे स्पष्ट होते.

आता शरद पवारांचे ३० जुलैचे एकात्मता परिषदेतील भाषण आठवू या, महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल की काय अशी चिंता पवारांनी जाहीरपणे व्यक्त केली होती.

एकंदरीत महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे वरील सर्व घटनांवरून दिसते असं केशव उपाध्येंनी म्हटलं आहे.

काय आहेत भाजपाचे आरोप?

१) राज्यात अराजकता निर्माण करण्याला शरद पवारांनी मजबूत पायाभरणी केली. हा पाया होता मराठा आरक्षणाच्या मुद्याचा, मनोज जरांगे पाटील यांच्या कानात पवारांनी मुंबईतून आंतरवली सराटीत जाऊन सांगितलेल्या गोष्टी? या पवार जरांगे यांच्या कानगोष्टीनंतरच आरक्षणासाठी देवेंद्रजींना जबाबदार आहेत अशी वक्तव्ये जरांगे करू लागले. त्यांच्याच राजीनाम्याची मागणी ते आजपर्यत करत आहेत.

२) मराठा आरक्षणातच आम्हाला स्वतंत्र नको त ओबीसीतूनच आरक्षण द्या अशी मागणी करण्यासाठीही पवारांनी कानमंत्र दिला होता का? राज्यात मराठा आणि ओबीसी समाजांना एकमेकांसमोर उभे करण्यात पवार यशस्वी झाले. हे कशासाठी होते याचे उत्तर या वरील चारपाच घटनांमधून मिळते. कारण या दोन समाजांना आमनेसामने आणून राज्यात निवडणुकीपूर्वी अराजकता परसवून त्याचा फायदा घेत निवडणुकी जिंकण्याचे गणित मविआचे आहे.

महाराष्ट्रात अराजकाचं दिवास्वप्न ! संकल्पना, सूत्रधार, दिग्दर्शन, निर्माता
मविआ. असं केशव उपाध्येंनी दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केशव उपाध्ये म्हणाले, मविआला आगामी निवडणूक जिंकण्यासाठी मैदान तयार करणे म्हणजेच महाराष्ट्रात अराजकता निर्माण करणे इतकं साधं सोपं गणित मांडण्यात महाविकास आघाडी गुंतली आहे.

हे गणित कसं मांडल जातंय? काय म्हणाले केशव उपाध्ये?

मराठा आरक्षण, ओबीसींचे आरक्षण बचाव आंदोलन, हिंदू मिरवणूकीवर दगडफेक, रामगिरी विरूद्ध मुस्लिम समाजाचे रस्त्यावर आंदोलन, बदलापूरची दुर्दैवी घटना, निषेधार्थ महाराष्ट्र बंदचे आवाहन, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन, त्यात उतरण्याची पवारांनी दिलेली धमकी आणि परिक्षा पुढे गेली तरी आंदोलन संपू नये, याची अगोदरच केलेली तजवीज…

एकापाठोपाठ घडलेल्या घटनेचा मूळ गाभा आहे तो जनतेला सरकारविरूद्ध भडकवणे, त्यांची आंदोलनं सुरू करून द्यायची, अन् पुढे निवडणुकीत मतं मिळवायची…

पण महाराष्ट्रातील जनता इतकीही दुधखुळी नाही, लबाडाचे आवताण ते जेवल्याशिवाय खरं मानत नाहीत !

केशव उपाध्येंनी काय मुद्दे मांडले आहेत?

१) महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती होईल का? अशी चिंता वाटते : शरद पवार (३० जुलै) मुंबई सामाजिक ऐक्य परिषदेतील भाषण

२) महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती व्हायला शरद पवारांनी हातभार लावू नये : राज ठाकरे, सोलापूर पत्रकार परिषद (५ ऑगस्ट)

३) बांगला देशातील हिंदूच्या समर्थनार्थ मिरवणुकीनंतर दगडफेक
(१७, १८ ऑगस्टच्या घटना)

४) बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हिंदू संघटनेने काढलेल्या निषेध मिरवणुकीत वाहनांच्या शोरूमवर काही दगडफेक झाल्याने उत्तर महाराष्ट्रातील जळगाव शहरात शुक्रवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. नाशिकमध्ये एका हिंदू संघटनेच्या बाइक रॅलीदरम्यान दोन गटांमध्ये हाणामारी झाल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

५) रामगिरी महाराजांविरुद्ध एफआयआर: दुसरीकडे, महंत रामगिरी यांनी प्रेषित मोहम्मद आणि इस्लाम यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे मुस्लिम समुदायाच्या सदस्यांनी दोन जिल्ह्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध खटले दाखल केले. नाशिकमधील येवला येथील रामगिरी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी सांगितले की, वैजापूर येथील एका स्थानिक व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या बोलण्याने मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण झाली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

६) जळगावात मिरवणुकीत दगडफेक झाली: बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हिंदू संघटनेने काढलेल्या निषेध मिरवणुकीत वाहनांच्या शोरूमवर शुक्रवारी काही दगडफेक करण्यात आल्याने उत्तर महाराष्ट्रातील जळगाव शहरात तणाव निर्माण झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. “बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने काढलेल्या मिरवणुकीत जळगाव शहरात ही घटना आज सकाळी घडली,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. “काही अज्ञात लोकांनी दुचाकी शोरूमवर काही दगडफेक केली.”

बदलापूरच्या घटनेबाबत काय म्हटलं आहे या पोस्टमध्ये?

बदलापूरमध्ये शाळेत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. त्याच्या निषेधार्थ पालकांनी त्यांच्या भावना आंदोलनातून व्यक्त केल्या. मात्र शाळेसमोर सुरू झालेले हे आंदोलन बदलापूरच्या रेल्वेरूळांवर पोचले का? याचे उत्तर पोलिसांवर झालेल्या दगडफेकीतूनच मिळते. कारण पालकांच्या आंदोलक पालकांच्या एसआयटी चौकशी, फास्ट ट्रॅक कोर्टाच खटला चालवणे, शिक्षण संस्थेवर कारवाई या सर्वच मागण्या मान्य झाल्या, त्यामुळे आंदोलन करणारे पालक निघून गेले असणार. मग हेच आंदोलन रेल्वे रूळाक़डे कसे गेले कोणी नेले आणि तेथे जमणारी गर्दी ही कोण होती हे सर्व उघड झाले पाहिजे. या घटनेवर सर्वच मविआचे नेते राजकीय फायद्यासाठी सरकारवर तोंडसुख घेत होते. आता पुढे काय करायचे तर मग महाराष्ट्र बंद. शनिवारी दि. २४ ला मविआने महाराष्ट्र बंदचे केलेले आवाहन हे घडलेल्या प्रकाराच्या निषेधार्थ असले तरी त्याला राजकरणाचा वास जास्त येत आहे हे नक्की.

१) एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते, ते एमपीएससी आणि आयबीपीटीची परिक्षांचे वेळापत्रक क्लॅश होत होते त्यामुळे. तारखा बदलण्याची गरज होतीच.

२) एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन हे पहिल्यांदा झालेले नाही, मविआ सरकार असताना पेपरफुटीपासून अनेक घटना घडल्या पण तेव्हा शांत असणारे फक्त शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते भेटतात, सरकारच्या विरोधात टीकटिप्पणी करतात.

३) आज परिक्षेची तारीख पुढे ढकलणार याचा अंदाज आल्यामुळेच शरद पवारांनी सरकारला काही सूचना करण्याऐवजी सरळसरळ आंदोलनात उतरण्याची धमकी ही राज्यात अराजकता माजवण्याच्या टुलकिटचा भाग वाटतो. अशी पोस्ट केशव उपाध्येंनी केली आहे.