शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी “राजकारणात पुतण्यांनी खूप घोटाळा करून ठेवलाय” असं वक्तव्य केल्यानंतर त्याचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी जोडला जात आहे. याबाबत पत्रकारांनी राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारणा केली. त्यावर त्यांनी सूचक वक्तव्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “संजय राऊत जी भाषा बोलत आहेत ती कुणाची भाषा बोलत आहेत हा खरा प्रश्न आहे. संजय राऊत स्वतःचं मत व्यक्त करतात की ते आणखी कुणाचा सल्ला घेऊन बोलतात याचा शोध घेण्याची गरज आहे.”

“महाविकासआघाडीत दिवसेंदिवस भविष्यकारांची संख्या वाढत आहे”

“सरकार कोसळणार या राऊतांच्या दाव्यावर विखे म्हणाले, “संजय राऊतांचं मानसिक संतुलन ढासाळलं आहे. ते मागील चार महिन्यांपासून सांगतात की, १० दिवसात, १५ दिवसात सरकार जाणार आहे. महाविकासआघाडीत दिवसेंदिवस भविष्यकारांची संख्या वाढत आहे,” असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी टोला लगावला.

हेही वाचा : “…मग फडणवीसांच्या गळ्यात मंगळसुत्र बांधा”, राऊतांच्या टीकेला विखेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “लग्न…”

“लोकांना संभ्रमात ठेवणाऱ्या शरद पवारांना अजित पवार संभ्रमात ठेवतात हे विशेष”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येत्या काळात मविआ एकत्र लढेल हे आत्ताच सांगता येणार नाही, असं वक्तव्य केलं. त्यावर बोलताना राधाकृष्ण विखे म्हणाले, “मला अजित पवारांबाबतचा एक प्रश्न विचारण्यात आला होता. मी कालही त्याचं उत्तर दिलं आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. राजकारणात लोकांना संभ्रमात ठेवणं ही त्यांची हातोटीच आहे. आता त्यांना अजित पवार संभ्रमात ठेवतात यापेक्षा कोणती मोठी गोष्ट असू शकते.”

“हे उसणं अवसान आणण्याचा हा प्रकार”

“त्यांनी काय निर्णय करायचा, त्यांच्या वक्तव्याचा काय अर्थ काढायचा हे मला माहिती नाही. म्हणून मी म्हटलं होतं की, महाविकासआघाडीच्या वज्रमुठीला तडे गेले आहेत. ग्रामीण भागात म्हणतो तसं हे उसणं अवसान आणण्याचा हा प्रकार आहे. मविआमध्ये आता काही अर्थ उरलेला नाही,” असं मत विखेंनी व्यक्त केलं.

“भविष्यात राष्ट्रवादीबरोबर आली तर भाजपा इच्छूक आहे का?”

“भविष्यात राष्ट्रवादीबरोबर आली तर भाजपा इच्छूक आहे का?” या प्रश्नावर राधाकृष्ण विखे म्हणाले, “भविष्यात राष्ट्रवादीला बरोबर घ्यायचं की नाही हा निर्णय पक्षपातळीवर पक्षाचे नेतेमंडळी घेतात. कुणाला बरोबर घ्यायचं कुणाला नाही हा निर्णय पक्षाने घ्यायचा असतो.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp radhakrishna vikhe comment on sanjay raut statement mention ajit pawar pbs
Show comments