लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशासह राज्यात मोठ्या घडामोडी वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित असं यश मिळालं नाही. महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या आहेत. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत घेत मोठं विधान केलं. “महायुतीला महाराष्ट्रात काही जागा कमी आल्या, त्याची जबाबदारी माझी आहे. मी मान्य करतो. मी स्वत:यामध्ये कमी पडलो. ती कमतरता भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. पक्षनेतृत्वानं मला सरकारमधून मोकळं करावं”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्यानंतर ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीस यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहून संघटनेचं काम करावं”, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
“महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीनंतर आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये आलेल्या अपयशाचं आम्ही चिंतन केलं आहे. त्या माध्यमातून आता आम्ही पुढे जाणार आहोत. पुढे जाण्यासाठी आम्ही एक रोडमॅप तयार करणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षनेतृत्वानं सरकारमधून मोकळं करण्यासंदर्भात जे विधान केलं. मात्र, त्यांनी त्यांची ती भावना व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस हे नेहमी संघटनेच्या कामावर भर देतात. त्यांची ही भूमिका महत्वाची आहे. मात्र, पूर्णवेळ संघटनेवर काम करण्यासाठी सरकारच्या बाहेर येऊन काम करण्याची आवश्यता नाही. सरकारमध्ये राहूनही संघटनेचं काम करता येतं”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
“आम्ही भाजपाचे सर्व सदस्य त्यांना विनंती करत आहोत की, सरकारमध्ये काम करुनही संघटनेला चार दिवस देता येतात. आमची संघटना पुन्हा ताकदीने उभा होईल. पक्षाची संघटना आणि सरकारमध्ये समन्वयाची भूमिका ठेवून काम करण्याची गरज आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेला पुढे घेऊन जावं. काल लोकसभेचा निकाल लागला. त्यामध्ये जागा कमी आल्या त्यामुळे त्यांच्या मनात दु:ख आहे. त्यामधून त्यांनी व्यक्त केलेली ती भावना आहे”, असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.
बावनकुळे पुढे म्हणाले, “मी आपल्याला सांगू इच्छितो की, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची गरज नाही. त्यांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेला मदत करण्याची गरज आहे. ते आमच्या कोर कमीटीच्या सदस्यांचा निर्णय मान्य करतील, असा विश्वास आहे. खरं तर महाराष्ट्रात महायुतीला कमी जागा आल्यामुळे आम्हालाही दु:ख आहे. ही जाबाबदारी फक्त देवेंद्र फडणवीसांची नाही, तर ती सर्वांची आहे. आम्ही सर्वजण फडणवीस यांच्याबरोबर आहोत”, असं सूचक विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.