सांगली : एकाचे चार कारखाने होत असताना या मतदार संघात शेतकऱ्याला विकासापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले, ३५ वर्षांत पाणंद रस्ते दर्जेदार विकसित होणे आवश्यक होते, मात्र शेतकरी हा कायम चिंताग्रस्त राहिला पाहिजे, अशी खबरदारी इस्लामपूरच्या आमदारांनी घेतली, हे दुर्देवी आहे, अशा शब्दांत सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निशीकांतदादा पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

बावची, गोटखिंडी व कोरेगाव येथील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा इस्लामपूर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, युवा मोर्चा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तालुकाध्यक्ष निवास पाटील, महिला आघाडी अध्यक्षा सुरेखाताई जगताप आदींसह भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.

हे ही वाचा…Ajit Pawar : “एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह आणि शक्ती बॉक्स”, अजित पवारांची लाडक्या बहिणींसाठी योजना

श्री. पाटील म्हणाले, मतदारसंघाचा विकास खुंटला याला विद्यमान आमदार कारणीभूत आहेत. त्यांनी इतके वर्षे आमदार आणि राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाची पदे भूषवली आहेत. परंतु त्यांना त्यांच्या मतदार संघातील पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली काढता आला नाही. कारण इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांची अवस्था जैसे थे आहे. शेतकऱ्यांना या रस्त्यांवरून ये-जा करताना, खते, धान्य, आदींची वाहतूक करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे येथील शेतकर्यांचे दुर्दैव आहे. कारखान्याचे अधिकारी फक्त ऊस मागायला येतात. वाहतुकीचा व रस्त्यांचा विषय काढला की वेगवेगळ्या प्रकारे उत्तरे शेतकऱ्यांना देतात, उसाची अडवणूक केली जाते, ही येथील वस्तुस्थिती आहे. या त्रासातून तुम्हाला मुक्त व्हायचे असेल तर स्वाभीमाने पुढे येऊन येथील राजकीय व्यवस्था बदलण्याची गरज आहे.