सांगली : नरेंद्र मोदी निवडून येणे ही केवळ देशाचीच नव्हे तर जगाची गरज आहे. जगात सुरू असलेल्या युद्धामध्ये मोदींच्यामुळे तीन दिवस युद्धविराम मिळाला. मात्र, काही मंडळी सूर्य झाकण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्या गाडीला चालकच नाही असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगलीत व्यक्त केले.
सांगलीत लोकसेवा विश्वस्त संस्थेच्यावतीने आयोजित उद्यम प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाच्या नेत्या नीता केळकर यांनी आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माध्यम प्रतिनिधीशी मंत्री पाटील यांनी संवाद साधला. ते म्हणाले, सुर्याला झाकता येत नाही. मात्र, काही मंडळी झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या ट्रेनमध्ये अनेक लोक गर्दी करीत असले तरी त्यांच्या ट्रेनला चालकच नाही.
राज्यात उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान झाल्यानंतर तुमचे महत्व कमी झाले आहे का असे विचारले असता, मी एक कोरे पाकीट असून पक्ष, संघटना त्याच्यावर कोणता पत्ता देईल त्या ठिकाणी जायचे एवढेच माझे काम आहे. पक्षात एक शिस्त असल्याने पक्ष फुटीचा प्रसंग कधीच भाजपावर आलेला नाही. काही मंडळी नाराज होऊन बाजूला गेली असली तरी त्याचा पक्षावर काहीच परिणाम होत नाही.
हेही वाचा – सांगलीच्या हृदयाची मुंबईत धडधड, रुग्णावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या कामाची स्वतंत्र पद्धत असून दोघेही कामासाठी योग्यच आहेत. फडणवीस यांची संवेदनशीलता महापुरावेळी दिसून आली तर पवार यांच्या कामाचा उरक मोठा असून प्रशासनावरही त्यांचा वचक आहे. मराठा आरक्षण फडणवीस यांनी दिले होते, मात्र, महाविकास आघाडी सरकारला ते न्यायालयात टिकवता आले नाही. महाराष्ट्राची सर्व जातींना बरोबर घेऊन वाटचाल करण्याची संतांची शिकवण आणि परंपरा आहे. यामुळे तेढ निर्माण होईल असे वक्तव्य टाळून मुख्यमंत्र्यासमवेत चर्चेला बसावे, चर्चेतूनच मार्ग निघू शकतो असेही मंत्री पाटील यावेळी म्हणाले.