लोकसभा निवडणुकांनंतर आता विधानसभा निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्ष, उमेदवार आणि विश्लेषकांना लागले आहेत. लोकसभा निवडणुक निकालांचे पडसाद विधानसभा निवडणुकांवरदेखील पडण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यानुसार सर्वच राजकीय पक्ष कामाला लागल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या जागा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्यामुळे या पराभवाची कारणं आणि पुढील धोरण यासंदर्भात युतीच्या मित्रपक्षांत मोठ्या प्रमाणावर विचारमंथन चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दाखवलेली असताना आता चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे.

“मराठा समाजामध्ये भाजपाबद्दल असंतोष”

मराठा समाजामध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल असंतोष असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना मान्य केलं. “भाजपाने मराठा समाजाला वेळोवेळी आरक्षण आणि सुविधा दिल्या. मात्र, पण त्यानंतरही मराठा समाजात भाजपाबद्दल असंतोष आहे असं आमच्या चर्चेतून समोर आलं आहे. हा असंतोष का आहे? यावर आमची सविस्तर चर्चा झाली. शेवटच्या मराठा माणसापर्यंत आम्ही दिलेल्या गोष्टींबाबत माहिती पोहोचवण्यात, योजनांची मदत पोहोचवण्यात कमी पडलो आहोत. ही माहिती मराठा समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

२३ मार्च १९८२…आण्णासाहेब पाटील यांची आत्महत्या अन् मराठा आंदोलनाची पहिली ठिणगी! ४१ वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं?

“अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी १९८२ साली आत्महत्या केली. पण १९८२ ते १९९५ पर्यंत अण्णासाहेब पाटलांच्या नावाने साधं महामंडळ करण्याचाही विचार त्या वेळच्या राज्यकर्त्यांच्या डोक्यात आला नाही. पहिलं अण्णासाहेब पाटील महामंडळ १९९५ साली आलं. त्यानंतर आमचं सरकार गेलं. पुढच्या जवळजवळ १५ वर्षांत ५० कोटींच्या वर या महामंडळासाठी तरतूद गेली नव्हती. २०१४ नंतर ती तरतूद हजार कोटींपर्यंत गेली”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“…तरी मराठा समाजाचा आमच्यावर रोष आहे?”

दरम्यान, भाजपानं इतक्या सगळ्या गोष्टी करूनही मराठा समाजाचा भाजपावर रोष का आहे? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. “पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण आणि सवलती या गोष्टी वेगळ्या केल्या. आरक्षण मिळेपर्यंत ओबीसींच्या सगळ्या सवलती मराठा समाजाला दिल्या. हे इतिहासात पहिल्यांदा घडलं. हे देवेंद्र फडणवीसांनी केलं. २०१७ साली मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात टिकवलं. ते गेलं उद्धव ठाकरेंच्या काळात. पुन्हा मिळवलं एकनाथ शिंदेंच्या काळात. तरी मराठा समाजाचा रोष आहे? यासाठी आम्ही विचारमंथन केलं. त्यातून आणखी काही गोष्टी करण्याचे मुद्दे आले”, असं ते म्हणाले.

बहिणीच्या पराभवावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “या सगळ्या पराभवाची जबाबदारी…”

“निवडून येण्यासाठी जी मतं लागतात, ती न मिळण्यामागच्या अनेक कारणांमध्ये हे एक कारण आहे की मराठा समाजाला ज्या सुविधा दिल्या, आरक्षण दिलं त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना एकत्र सोबत घेऊ शकलो नाही”, असंही त्यांनी नमूद केलं.

Live Updates