मुलींच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेची आठवण व्हावी म्हणून आम्ही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना बदाम पाठवणार आहोत, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गट) नेत्या रोहिणी खडसे यांनी केलं होतं, त्यांच्या या विधानावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, या विधानावर आता चंत्रकांत पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांनी विविध विषयांवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना रोहिणी खडसे यांच्या विधानाबाबतही विचारण्यात आलं, यासंदर्भात बोलताना मी कोल्हापूरचा असून मला बदामाची गरज नाही, असं प्रत्युत्तर त्यांनी रोहिणी खडसे यांना दिलं.

हेही वाचा – चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर छगन भुजबळांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “बोलताना जरा…”

नेमकं काय म्हणाले चंद्रकात पाटील?

“रोहिणी खडसे कदाचित मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याबाबत बोलत असाव्यात. त्यांचं आणि माझं नाव सारखं असल्याने त्यांचा नेहमी गोंधळ होतो. त्यामुळे त्यांना कदाचित त्या चंद्रकांत पाटलांना बदाम पाठवायच्या असतील, मला बदामाची आवश्यकता नाही, कारण मी कोल्हापूरचा आहे”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

रोहिणी खडसे यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील मुलांनी मोफत शिक्षण देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांनी अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. यावरून रोहिणी खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. “महायुती सरकारने मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी अद्यापही केलेली नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना त्या घोषणेची आठवण व्हावी म्हणून आम्ही त्यांना बदाम पाठवणार आहोत, असं त्या म्हणाल्या होत्या. तसेच राज्यात लवकरच मुलींच्या महाविद्यालयीन प्रवेशाला सुरुवात होणार असून हजारो मुली सरकारच्या या निर्णयाकडे आशेने बघत आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती.

हेही वाचा – महायुतीत महाबिघाड? पुण्यातील ‘चिंताजनक घटने’वर अजित पवार गटाची थेट चंद्रकांत पाटलांवर टीका!

मुलींच्या मोफत शिक्षणाच्या अंमलबजावणीला विलंब का?

दरम्यान, राज्य सरकारने या मुलीच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली असली तरी या घोषणेच्या अंमलबजावणीला का विलंब का होतो आहे? याबाबत चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती. “लोकसभा आणि आता मुंबईत लागू असलेल्या आचारसंहितेमुळे त्याचा शासन आदेश जाहीर होण्यास विलंब झाला आहे. लवकरच त्याची कार्यवाही पूर्ण होऊन शासन आदेश लागू होईल”, असं ते पुण्यातील एका कार्यक्रमात म्हणाले होते.