भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारबाबत नवी भविष्यवाणी केलीय. उत्तर प्रदेशमध्ये सात मार्चला विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान झालं की राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. कोठड्या तयार आहेत, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी सूचक इशारा दिला. ते मंगळवारी (२२ फेब्रुवारी) कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. काही जात्यात गेले तर काही सुपात आहेत. कोठड्या तयार आहेत. उत्तर प्रदेशात सात मार्च रोजी शेवटचे मतदान झाले की, बहुधा कारवाई सुरू होईल. त्यातून पळता भुई थोडी होईल व त्यातून हे सरकार पडेल, असे आपले विश्लेषण आहे. असा अंदाज सामान्य माणूसही बांधू शकतो.”

“सात मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील”

यावेळी चंद्रकांत पाटलांना दिशा सालियानच्या मृत्यूचे राजकारण होत असल्याच्या आरोपाबाबत विचारणा करण्यात आली. यावर ते म्हणाले, “याबाबतीत काहीही राजकारण होत नाही. सात मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील. ‘दूध का दूध, पानी का पानी होईल’, कोण गुंतले आहे आणि कोणाला तुरुंगात जावे लागेल हे स्पष्ट होईल. सध्या त्यामुळेच उसने अवसान आणून शिवराळ भाषा वापरणे चालू आहे. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो तसा हा प्रकार आहे.”

हेही वाचा : “किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू होता, हे गुंडाराज…”, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

“…यामुळे शेतकरी ऊसशेती सोडून देतील”

चंद्रकांत पाटलांनी सरकारच्या ऊस एफआरपी धोरणावरही टीका केली. “महाविकास आघाडी पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे. उसाचे एफआरपीचे पैसे दोन तुकड्यात देण्याचा या सरकारचा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करणारा आहे. यामुळे शेतकरी ऊसशेती सोडून देतील असा धोका आहे. भारतीय जनता पार्टी या निर्णयाविरोधात टोकाचा संघर्ष करेल,” असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.

Story img Loader