राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचे नाव घेत इंदापूरमध्ये मोठे विधान केले आहे. शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. त्यांचा महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येतात, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुळे यांच्या विधानाचा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी समाचार घेतला आहे. आता तो काळ गेला. आता स्वत:ला सिद्ध करावे लागते. सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी कोणताही स्टार उमेदवार देण्याची गरज नाही. भाजपाचा कोणताही उमेदवार त्यांचा पराभव करू शकतो, असे बावनकुळे म्हणाले.
शरद पवार यांचे नाव वापरून त्यांचे, काम वापरून किती दिवस मोठे व्हाल. स्वत:चे कर्तृत्व दाखवावे लागेल. शरद पवार यांनी त्यांच्या जीवनात काम केलं. मात्र त्यांच्या कामावर दुसरे किती दिवस तग धरतील. आता तो काळ गेला आहे. जो पदावर आहे, तो किती काम करतो, असे जनता विचारत आहे, असे बावनकुळे म्हणाले.
बारामतीमध्ये गेल्यानंतर घडी बंद पाडायची असेल तर बारामतीतून पाडा, असे मी कार्यकर्त्यांना आवाहन केले. तेव्हापासून सुप्रिया सुळे यांना रोज २५ गावे फिरावी लागत आहेत. करोना महासाथीच्या काळात बारामतीमध्ये राष्ट्रवादीचा कोणताही नेता नव्हता. बारामतीमधील एक विधानसभा सोडता बाकीच्या पाच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते दिसले नाहीत.
हेही वाचा >>> गॅस सिलिंडरच्या वापरावर मर्यादा आणल्याने सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारवर निशाणा; म्हणाल्या, “सणासुदीच्या काळात…”
तेथील एका विधानसभेत सरकार पोहोचले आहे. बाकीच्या ५ मतदारसंघांमध्ये पाटी कोरी आहे. त्यामुळे तेथे प्रचंड नाराजी आहे. आम्ही ४५ पेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघ जिंकणार आहोत. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ क्रमांक एकवर राहणार आहे. सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी कोणत्याही स्टार उमेदवाराला उभे करण्याची गरज नाही. तेथे साधा उमेदवारही जिंकेल, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.