देश आणि गरीब कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्य उभ केलं. त्या नऊ वर्षाच्या कार्यकाळाच्या पार्श्वभूमीवर संपर्क ते समर्थन अभियान देशात आणि महाराष्ट्रात सुरु आहे. तसेच, अजित पवार आणि आमदारांनी भविष्यातील भारत निर्माण करण्यासाठी समर्थन दिलं आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्यांना सरकारमध्ये मंत्री बनवण्यात आलं, असं विधान शरद पवारांनी केलं होतं. याबद्दल विचारल्यावर बावनकुळे म्हणाले, “राजकारणात बेरजेला महत्व आहे. सरकारमध्ये जे पक्ष आलेत, त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशासाठी काय चांगलं करता येईल; याला जास्त महत्व आहे. अजित पवार, भाजपा आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने हे पाऊल आहे.”

“अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा अनुभव महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी कामात येईल,” असं बावनकुळेंनी सांगितलं आहे.

हेही वाचा : राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार? अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

एक वर्षापासून शिंदे गटातील आमदारांना मंत्रीपद दिलं नाही. दोन तासांत राष्ट्रवादीचं आमदार मंत्री झाले असा प्रश्न विचारल्यावर बावनकुळेंनी म्हटलं की, “एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार हे कशासाठी आले, हे समजून घेतलं पाहिजे. मंत्रीपदासाठी कोणीही बरोबर येत नाही. हिंदुत्वाचा विचार आणि महाराष्ट्राला क्रमांक एक करण्याचा विचार आहे. राजकारणात मंत्रीपदच महत्वाचे आहे का?”

हेही वाचा : ९ आमदारांना राष्ट्रवादीचे दरवाजे बंद, इतरांसाठीही काही काळ किलकिले – जयंत पाटील

“राजकारणात आमदार-खासदार होणे महत्वाचे आहे का? राजकारणात विकास दडलेला असतो. कधीकधी देशहितासाठी काही गोष्टींची तडजोड करावी लागते. देशहित आणि राष्ट्रहित महत्वाचं आहे. मंत्रीपदासाठी भाजपाचे कार्यकर्ते काम करत नाहीत,” असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule on sharad pawar minister oath statement ssa