राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाने भाष्य केलं आहे. “शरद पवार हे मोठे नेते नक्कीच आहेत. परंतु त्यांचा पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले,” असं मत ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलं आहे. यावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अग्रलेखात म्हटलं आहे की, “शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर एक मोठे नेते नक्कीच आहेत. त्यांच्या शब्दाला देशाच्या राजकारणात मान असला, तरी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले.” या अग्रलेखात ठाकरे गटाने इतरही अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. यात पुढे म्हटलं आहे की, “भाजपाची पोटदुखी अशी की, शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपाचा प्लॅन होता. लोक बॅगा भरून तयारच होते आणि येणाऱ्यांच्या ‘लॉजिंग-बोर्डिंग’ची व्यवस्था पूर्ण झाल्याचं सांगितलं जात होतं. परंतु शरद पवारांच्या खेळीने भाजपाचा प्लॅन केराच्या टोपलीत गेला. त्यामुळे भाजपाची पोटदुखी वाढली आहे.

हे ही वाचा >> “काँग्रेसला २०१४ मध्ये धोका मिळाल्यामुळे…”, महाविकास आघाडीच्या जागावाटपावर नाना पटोलेंची भूमिका स्पष्ट

यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी छगन भुजबळ यांना प्रतिक्रिया विचारली असता भुजबळ म्हणाले, सामनाचा अग्रलेख हा खासदार संजय राऊतंच लिहितात. त्यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे? त्यांना काय अडचण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असं त्यांना वाटतं का? महाविकास आघाडीत मनभेद निर्माण व्हावेत असं राऊतांना वाटतं का?

Story img Loader