Minister Chagan Bhujbal: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवारांची भेट घेतली, त्यामुळे त्यांच्या भेटीची चांगलीच चर्चा झाली. कारण बारामतीत त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणात त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. शरद पवारांनी आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचं काम केलं असा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन छगन भुजबळ त्यांना भेटले. या भेटीत कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्याची एक सविस्तर पोस्टच छगन भुजबळ यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छगन भुजबळ पवारांच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधाण

जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होत आपले काका आणि त्यांचे राजकीय गुरु शरद पवार यांना धक्का दिला. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे ४२ आमदारही आले. त्यावेळी छगन भुजबळ यांच्याबाबत शरद पवारांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली होती. छगन भुजबळ तिकडे गेले त्याबाबत शरद पवारांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, “तिकडे (अजित पवार गट) काय चाललं आहे बघून येतो. त्यानंतर त्यांनी थेट मंत्रिपदाची शपथ घेतली.” हे वक्तव्य ऐकून एकच हशा पिकला होता. त्यानंतर शरद पवार यांच्यावर छगन भुजबळांनी टीकाही केली. लोकसभेच्या निवडणुकीआधीही भुजबळ यांनी काही मुलाखती दिल्या त्यातही त्यांनी शरद पवारांविरोधात भूमिका घेतल्याचं दिसून आलं. एवढंच काय रविवारी बारामतीत त्यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले. हेच छगन भुजबळ सोमवारी शरद पवारांच्या भेटीला गेले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. अशात शरद पवारांसह नेमक्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्याची पोस्ट छगन भुजबळ यांनी लिहिली आहे.

मंत्री छगन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट (फोटो सौजन्य-फेसबुक)

शरद पवारांसह झालेल्या बैठकीत कुठल्या मुद्द्यांवर चर्चा?

राज्यातील सामाजिक परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती करण्यासाठी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसेच त्यांच्याशी खालील मुद्द्यांवर चर्चा केली.

गेल्या काही दिवसांत राज्यात जातीवरून एकमेकांबद्दल मनं कलुषित मराठा व ओबीसी एकमेकांशी व्यवहारही करेनासे झाले आहेत

राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेणं ही त्यांची जबाबदारी

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावरून मराठवाडा पेटलेला असताना तो शांत करण्यासाठी सत्तेचा विचार न करता त्यांनी घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाची आठवण करून दिली.

परंतु सध्याच्या या अशांततेच्या परिस्थितीत मात्र आपला कोणताही पुढाकार दिसत नाही, याबद्दल खंत व्यक्त केली. यावर त्यांनी मराठा किंवा ओबीसी उपोषणकर्त्यांना सरकारने काय आश्वासने दिली, याची काहीच कल्पना नसल्याचे सांगितले.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गावागावात काय परिस्थिती आहे, याबद्दल त्यांचा अभ्यास अधिक आहे. त्यामुळे आपण पुढाकार घेतला पाहिजे, अशी विनंती त्यांना केली.

यावर येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री महोदयांशी बोलून मराठा व ओबीसी उपोषणकर्त्यांना सरकारने दिलेल्या आश्वासनांबाबत माहिती घेण्याचे, तसेच हा प्रश्न सोडविण्यासाठी कशा पद्धतीने आणि कोणाकोणाशी चर्चा करता येईल, हे ठरवणार असल्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिलं आहे.

हे पण वाचा- Chhagan Bhujbal : “भुजबळांनी परतीचे प्रयत्न केले…”, अनिल देशमुखांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “त्यांची दुटप्पी भूमिका…”

राज्यातील वातावरण शांत व्हावं म्हणून शरद पवार पुढाकार घेतील

सध्या महाराष्ट्रात तंग झालेलं वातावरण शांत व्हावं, यासाठीच माझा हा प्रयत्न होता आणि यासाठी कोणालाही भेटण्याची वेळ आली तरी माझी त्यासाठी तयारी आहे. राज्यातील वातावरण शांत असलं पाहिजे, गोरगरिबांची घरे पेटता कामा नयेत, एकमेकांच्या जीवावर कोणी उठू नये हाच माझा यामागील हेतू आहे. केवळ सामाजिक प्रश्न म्हणून सर्व मतभेद, पक्ष बाजूला ठेवून यावर विचार करण्याची गरज आहे. या गोष्टीला राजकारणाचा कोणताही गंध लागता कामा नये, अशी प्रामाणिक अपेक्षा आहे. मला स्वतःला ना राजकारणाची पर्वा आहे, ना पदाची! राज्य शांत राहण्यासाठी मला आणखी कोणालाही भेटण्याची आवश्यकता वाटली तर मी आवर्जून भेटेन. याबाबत कोणालाही विनंती करायला मला कोणताही कमीपणा वाटणार नाही. त्यामुळे शरद पवार साहेब लवकरच राज्यातील वातावरण शांत करण्यासाठी पुढाकार घेतील, असा विश्वास आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal post all pointers with sharad pawar meeting scj
Show comments