Chhagan Bhujbal : महात्मा फुले यांच्याबाबत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. महात्मा फुले हे ब्राह्मणविरोधी नव्हते तर त्यांनी ब्राह्मण्यवादाचा विरोध केला असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले या कवयित्री होत्या, ब्राह्मणाच्या यशवंत नावाच्या मुलाला ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी दत्तक घेतलं होतं असंही वक्तव्य छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी केलं.

काय म्हणाले छगन भुजबळ?

“थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांनी भारतीय स्त्री शिक्षणाचा पाया रचला. भारतातील स्त्रियांबरोबरच वंचित, शोषित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी कृतीशील लढा उभारला. तत्कालीन रूढीवादी, परंपराप्रिय समाजाचा विरोध पत्करून हे विधायक कार्य त्यांनी केले. तसेच देशाला पुरोगामी विचारांची दिशा दाखवली.” नाशिक जिल्ह्यात जो स्मारक लोकार्पण सोहळा पार पडला त्यावेळी छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी हे वक्तव्य केलं.

महात्मा फुले कोट घालायचे म्हणूनही टीका होत असे

“महात्मा फुले कोट घालायचे म्हणून नलावडे नावाचे एक गृहस्थ होते त्यांनी महात्मा फुलेंवर टीका केली होती. खरंतर वीर सावरकर कोट घालत असत, लोकमान्य टिळक कोट घालत असत. पण टीका फक्त महात्मा फुलेंवर झाली.” असं भुजबळ ( Chhagan Bhujbal ) म्हणाले.

हे पण वाचा- Chhagan Bhujbal : अजित पवारांनी महायुतीत किती जागा मागितल्या? छगन भुजबळांनी आकडाच सांगितला; म्हणाले…

महात्मा फुले ब्राह्मण विरोधी नव्हते

महात्मा फुले ब्राह्मणविरोधी नव्हते, ब्राह्मण्यवादाचे विरोधक होते. ब्राह्मणांपेक्षा आपल्याच लोकांनी महात्मा फुलेंना जास्त विरोध केला. महात्मा फुलेंनी पहिली शाळा भिडे वाड्यात सुरु केली. भिडे कोण? ब्राह्मण. त्यांना आपल्या लोकांनी विरोध केला. दुसरी शाळा चिपळूणकर वाड्यात सुरु केली. तेदेखील ब्राह्मण होते. असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. महात्मा फुलेंच्या विचारांना विरोध करणारे कर्मठ ब्राह्मण होते त्यापेक्षा आमच्यातले लोक जास्त होते हे आमचं दुर्दैव. त्यांना विरोध अनेकांनी फक्त अंधश्रद्धेतून केला. महात्मा फुलेंनी सगळ्या क्षेत्रात काम केलं. रामचंद्र गुहा यांनी महात्मा फुलेंचं वर्णन आधुनिक भारताचे शिल्पकार असं केलं आहे. तर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं होतं. महात्मा फुले यांनी सगळ्या समाजाचा विचार केला, कुठल्याही एका जाती, धर्माचा विचार केलेला नाही. ख्रिस्त, ब्राह्मण, मांग यांना धरावे पोटासी बंधुप्रमाणे हे त्यांनी म्हटलं होतं. असंही छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) म्हणाले.

सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंचं कार्य खूप मोठं

सावित्रीबाई फुले शाळा काढली म्हणून प्रसिद्ध होत्या. बावनकशी, काव्यफुला हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. सत्यशोधक कुटुंबात त्यांनी शरीरविक्रय करणाऱ्या महिला, परित्यक्त्या स्त्रियांना आसरा दिला. महात्मा फुले आणि सावित्रीमाईंनी केलेलं कार्य खूप मोठं आहे. यशवंत नावाचा मुलगा त्यांनी दत्तक घेतलं होतं. ते यशवंत पुढे डॉक्टर झाले. हेदेखील छगन भुजबळ यांनी सांगितलं.

३१ मे १९६९ या दिवशी महात्मा फुलेंचा पुतळा पुण्यात बसवण्यात आला. हा पुतळा १९२५ मध्ये बसवण्यात येणार होता. मात्र त्याला त्यावेळी विरोध झाला. महात्मा फुलेंचा पहिला पुतळा मराठा समाजाचे नेते माधवराव बागल यांनी बसवला. त्याचं अनावरण बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं होतं. हा इतिहासही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.