Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse in Sindhudurga Raj Thackeray Reacts : अवघ्या आठ महिन्यांपूर्वी, ४ डिसेंबर २०२४ रोजी सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर मोठ्या उत्साहात भारतीय नौदल दिन साजरा करण्यात आला. यावेळी किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. मात्र आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळला आहे. त्यामुळे राज्य सरकारवर जोरदार टीका होऊ लगली आहे. ही घटना पाहून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या घटनेवरून सरकारची कानउघडणी केली आहे. राज ठाकरे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की "मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा? मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वगैरे काही केली होती का नव्हती? आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील 'पाच पुतळ्यांवरची' कविता आठवली. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी ही कविता मुद्दाम देत आहे". हे ही वाचा >> शिवाजी महाराजांचा ‘तो’ पुतळा कशामुळे पडला? एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण कुसुमाग्रजांची कविता मध्यरात्र उलटल्यावरशहरातील पाच पुतळेएका चौथऱ्यावर बसलेआणि टिपं गाळू लागले.ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा.शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ़्यांचा.आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा.टिळक उद़्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा.गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले,तरी तुम्ही भाग्यवान.एकेक जातजमात तरीतुमच्या पाठीशी आहे.माझ्या पाठीशी मात्रफक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती! प्रतीकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे : राज ठाकरे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की "पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हटलं होतं की महाराजांचं खरं स्मारक हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची आणि मग स्मारकांच्या निविदा काढायच्या, त्यातून काही मिळतंय का ते बघायचं इतकंच राहिलं आहे. या प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे आणि तसं घडलं तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो".