मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या भविष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सिन्नरमध्ये एका ज्योतिषाची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर आज पत्रकारपरिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला असून महाराष्ट्रात हे प्रकार नवीन असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय अनेक नेत्यांकडूनही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा – “सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार मोडले, हिंदुत्वाचे विचार सोडले आणि….”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर!

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “कामाख्या देवीला जाणार आहे हे मी जाहीरपणे सांगितलं आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन सरकार स्थापन केलेलं आहे. कुठल्याही मंदिरात जाण्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा वाटत नाही. आम्ही जे करतो ते उघडपणे करतो. लपूनछपून करत नाही, दिवसाढवळ्या करतो. काही लोक लपून छपून करतात, त्यामुळे आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही.”

हेही वाचा – “ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का?”; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल!

याचबरोबर हात दाखवण्याचा विषयावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आत्मविश्वास होता म्हणून तर ५० आमदारांसोबत १३ खासदार माझ्याबरोबर आले. जे महाविकास आघाडीचं सरकार होतं, ते कुणाचं काम करत होतं. कुणासाठी सरकार चालवलं जात होतं. ते सर्वसामान्यांना मान्य नव्हतं म्हणून सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलेलं आहे. हात आम्ही ३० जूनलाच ज्यांना दाखवायचा होता त्यांना दाखवलेला आहे, चांगला हात दाखवला आहे.”

नक्की पाहा – PHOTOS : छत्रपती शिवरायांबद्दल राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदींनी केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत आक्रमक, म्हणाले…

नेमकं प्रकरण काय आहे? –

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी (२३ नोव्हेंबर) शिर्डी दौऱ्यावर असताना अचानक पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल करून सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली. यानंतर एकनाथ शिंदेंनी ईशान्येश्वर मंदिरामध्ये एका ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. त्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Story img Loader