नाशिकच्या इगतपुरीसह अहमदनगर जिल्ह्यात आदिवासी पालकांनी आपल्या पोटच्या मुलांना पैशाच्या गरजेपोटी वेठबिगारीसाठी विकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी हा प्रकार दुर्दैवी असून अशा प्रकारच्या घटना यापुढे घडू नयेत, यासाठी विभागाकडून सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय, ज्या कातकरी समाजात ही घटना घडली, त्यांच्यासाठी डिसेंबरच्या आत सुविधा देण्याविषयी नियोजन केले जाईल, अशी ग्वाहीदेखील गावित यांनी लोकसत्ताला दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इगतपुरी तालुक्यातील कातकरी समाजाच्या १८ मुलांना वेठबिगारीसाठी पालकांनीच विकल्याचे उघड झाले आहे. मेंढ्या चारण्यासाठी विकण्यात आलेल्या आठ मुलांची पोलिसांनी सुटका केली. तर, एका १० वर्षाच्या मुलीचा छळामुळे मृत्यू झाला. या घटनेची विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दखल घेत राज्य शासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या.

हेही वाचा : इगतपुरीतील बाल वेठबिगारीमागील सूत्रधारांचा शोध घ्यावा – नीलम गोऱ्हेंची राज्य सरकारला सूचना

आदिवासी विकास मंत्री गावित यांनी यासंदर्भात घडलेला प्रकार गंभीर असल्याचे नमूद केले. असा प्रकार महाराष्ट्रात पुन्हा होऊ नये, यासाठी आपण खबरदारी घेणार आहोत. कातकरी समाजासाठी विभागाने विशेष नियोजन सुरु केले आहे. आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, घरकूल, शिधापत्रिका या सुविधा त्यांना देण्यासाठी डिसेंबरच्या अगोदर नियोजन करुन अमलबजावणी केली जाईल. या प्रकरणात मुले विक्री आणि खरेदी करणाऱ्यांची विभागाकडून सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे संकेतही गावित यांनी दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child abuse in igatpuri will be thoroughly investigated vijayakumar gavit msr