China Praises PM Narendra Modi: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेक्स फ्रिडमन पॉडकास्टमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना चीनबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. पंतप्रधान मोदींनी दिलेले या प्रश्नाचे उत्तर शेजारील देश चीनला खूप आवडले आहे. चीनचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याच्या विधानाचा हवाला देत पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे.
पंतप्रधान मोदींनी चीनबाबतच्या प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ विंग यांनी एक विधान जारी केले असून, ते म्हणाले “आम्ही पंतप्रधान मोदींच्या विधानाचे कौतुक करतो. भारत-चीन संबंध स्थिर आणि मजबूत करण्यासाठी त्यांनी परस्पर सहकार्याला कामयमच पाठिंबा दिला आहे.”
हत्ती आणि ड्रॅगनमधील बॅले नृत्य
एवढेच नाही तर माओ विंग यांनी भारताशी असलेल्या संबंधांबद्दल म्हटले आहे की, भारत आणि चीनने असे भागीदार बनले पाहिजे जे एकमेकांच्या यशात योगदान देतील. ते म्हणाले की, हत्ती आणि ड्रॅगनमधील बॅले नृत्य (सहकार्य) हा दोन्ही देशांसाठी योग्य पर्याय आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ते माओ विंग यांनी पुढे सांगितले की, “राजनैतिक संबंधांच्या ७५ व्या वर्धापन दिनाला चीन भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत करू इच्छित आहे. ते म्हणाले की दोन्ही देश स्थिर आणि ठोस विकासाकडे एकत्र पुढे जाऊ शकतात.”
मी ‘इंडिया फर्स्ट’च्या बाजूने
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांच्याबरोबरचे पॉडकास्ट काल प्रसिद्ध झाले आहे. या पॉडकास्टमध्ये मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनबरोबर असलेल्या नात्यांबद्दल भाष्य केले आहे. यावेळी मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विनम्रतेचे कौतुक केले आहे. ट्रम्प यांच्या डोक्यात त्यांचे प्रत्येक ध्येय साध्य करण्यासाठी स्पष्ट धोरण आहे असेही ते म्हणाले. तसेच ट्रम्प यांच्या डोक्यात ‘अमेरिका फर्स्ट’ आहे पण मी ‘इंडिया फर्स्ट’च्या बाजूने आहे असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
आमच्यामध्ये सीमावाद सुरू
पंतप्रधान मोदी यांना या पॉडकास्टमध्ये चीनबद्दल महत्त्वाची विधाने केली आहेत. ते म्हणाले की, “हे खरे आहे की आमच्यामध्ये सीमावाद सुरू आहे. २०२० मध्ये सीमेवर घडलेल्या घटनांमुळे आमच्या देशांमध्ये खूप तणाव निर्माण झाला. मात्र राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर आमच्यातील सीमांवर परिस्थिती पूर्ववत होताना दिसत आहे. आता आम्ही २०२० त्या आधीची स्थिती परत आणण्यासाठी काम करत आहोत. हळूहळू पण निश्चितपणे विश्वास, उत्साह आणि ऊर्जा परत आणली जाईल. पण यासाठी काही वेळ लागेल, कारण पाच वर्ष अंतर पडले आहे.”
२१वे शतक आशियाचे
ते पुढे म्हणाले की, “आमचे एकत्र येणे फायदेशीर तर आहेच याबरोबरच जागतिक स्थिरता आणि समृद्धीसाठी देखील आवश्यक आहे. कारण २१वे शतक हे आशियाचे आहे, त्यामुळे आमची इच्छा आहे की भारत आणि चीन यांच्यात निरोगी आणि स्वाभाविक पद्धतीची स्पर्धा असावी. स्पर्धा ही काही वाईट गोष्ट नाही, पण तिचे रुपांतर संघर्षात होता कामा नये.”