वरूड शहरातून वाहणाऱ्या चुडामनी नदीची गटारगंगा झालेली पाहून जागरूक वरूडकरांनी हाती घेतलेल्या चुडामनी स्वच्छता अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप आले असून ज्या नदीजवळून जाताना शब्दश: ‘नाक मुठीत धरून’ जावे लागायचे, त्या नदीच्या पात्राजवळ आता लहान मुले क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत आहेत. यापूर्वीही अनेकदा चुडामनीच्या स्वच्छतेसाठी अनेक मोहिमा राबवण्यात आल्या, पण त्याला अपेक्षित यश मिळू शकलेले नव्हते, पण यंदा मोठय़ा प्रमाणावर लोकसहभाग लाभला आहे.
मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी चुडामनीच्या स्वच्छतेसाठी ६ लाख रुपयांचा निधी देऊ केला आणि स्वच्छता अभियाना राबवण्यात पुढाकार घेणाऱ्या चुडामनी नदी मित्र परिवाराला मोठे बळ मिळाले. खासदार रामदार तडस यांनीही यासाठी १० लाखांचा निधी जाहीर केला आहे. अनेक दानदात्यांच्या सहयोगातून स्वच्छतेचे काम मार्गी लागत गेले. नदी पात्रातील बेशरमसह अहितकारी झाडा-झुडपांचे उच्चाटन आणि नदीचे खोलीकरण यातून नदीचे रुपडे पालटून गेले आहे. चुडामनीच्या काठावर वसलेल्या वरूड शहरात सुमारे पाच वर्षांपूर्वी तापाच्या साथीने विळखा घातला होता. अनेकांचे बळी गेले, त्यावेळी या नदीच्या अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर सरकारी पातळीवर नदीची स्वच्छता करण्यात आली, पण लगेच ही मोहीम थंड पडली, असे वरूडकर सांगतात. आता मात्र लोकांनीच ही नदी पूर्णपणे स्वच्छ करण्याचा विडा उचलला आहे.
चुडामनीचा उगम मध्यप्रदेशच्या सीमेजवळील मालेगावला होतो आणि सातपुडा पर्वतांमधून मार्गस्थ होत ही नदी वर्धा नदीला मिळते. १९८० च्या दशकापर्यंत चुडामनी नदीला बारमाही पाणी असे, पण अलीकडच्या काळात पावसाळ्याचे काही दिवस वगळता ही नदी वर्षभर कोरडीच असते. वरूडच्या मध्यभागातून वाहणाऱ्या या नदीची बकाल अवस्था झाली होती. शहरातील सर्व घाण सोडण्यात येत असल्याचे नदी प्रदुषित झाली. या नदीजवळून जाताना उग्र दर्प येत होता. साचलेल्या डबक्यांमधून येणारी ही दरुगधी वरूडकरांना असह्य झाली होती. पावसाळ्यात साथीच्या रोगाचे थमानही लोकांनी पाहिले. संपूर्ण शहराचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या या प्रकाराकडे आजवर दुर्लक्षच करण्यात आले होते, पण वरूडमधील काही जागरूक लोकांनी चुडामन नदी मित्र परिवारच्या माध्यमातून नदीच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली.
शहरातील दानशूर व्यक्ती आणि सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा मंडळांच्या सहयोगातून निधी उभा झाला. जेसीबीच्या सहाय्याने मोठय़ा प्रमाणावर गाळ काढण्यात आला. बेशरमची झुडुपे नष्ट करण्यात आली. नदीच्या खोलीकरणाचा फायदा आता शहराला होईल आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल, असा आशावाद आता वरूडवासीय व्यक्त करीत आहेत.