महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यासाठी निवड समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केली असल्याचे सांगून विरोधकांनी केलेल्या टीकेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला. नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्स येथील कार्यक्रमानंतर या मुद्यावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र महाराष्ट्रातील घराघरात पोहोचविले. त्यांचा शिवचरित्रावर प्रचंड अभ्यास आहे. त्यांच्याविषयी कुठलीही शंका उपस्थित होण्याचे कारणच नाही. त्यामुळे समितीने योग्य व्यक्तीचीच निवड केली. विशेष म्हणजे, समितीत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. आव्हाडांच्या आक्षेपाकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्र्यांनी या आक्षेपात काहीच तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm defends babasaheb purandare for maharashtra bhushan