Devendra Fadnavis : परभणीत १० डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर हिंसाचार झाला होता. या घटनेचे पडसाद राज्यात उमटले. या घटनेत काहींना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या घटनेसंदर्भात निवेदन देताना या संपूर्ण घटनेची माहिती सभागृहात दिली. परभणीत झालेल्या तोडफोडीत तब्बल १ कोटी ८९ लाख ५४ हजारांचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यंत्र्यांनी सभागृहात सांगितली. तसेच या प्रकरणात पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवी पेक्षा जास्त बळाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचं निलंबन करण्यात आल्याची माहितीही फडणवीसांनी दिली. तसेच कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून १० लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“परभणीतील घटनेवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं की, “ही घटना घडल्यानंतर काही संघटनांनी ११ डिसेंबर रोजी बंद पुकारला होता. हा बंद शांततेत पार पडावा म्हणून पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेतली होती. या बैठकीला ७० ते ८० विविध संघटनांचे कार्यकर्ते हजर होते. त्यानंतर काही संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिले होते. मात्र, त्यानंतर परभणीतील गंगाखेड रोडसह काही ठिकाणी आधी टॉवर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर अचानक ३०० ते ४०० आंदोलक जमा झाले. काही लोकांनी त्या ठिकाणी तोडफोड केली. त्या ठिकाणी जमावाने बंद असलेल्या दुकानांची देखील तोडफोड केली. काही गाड्या जाळण्यात आल्या. मात्र, त्यानंतर पोलिसांनी जमावबंदी लागू केली. मात्र, तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचं पाहून पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करत लाठीचार्ज केला”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.

हेही वाचा : Video: “तो अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला…”, कल्याण मारहाण प्रकरणी अजित पवारांनी विधानसभेत मांडली भूमिका!

“काही महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश करत काचा फोडल्या, खुर्च्या फोडल्या. मात्र, त्यानंतर सीआरपीएफची जास्त तुकडी मागवण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेतील ५१ लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामध्ये ४१ व्यक्तींना तीन गुन्ह्यांत अटक करण्यात आली. तसेच महिलांना अटक करण्यात आलेली नाही. त्यांना फक्त नोटीस देऊन सोडून देण्यात आलं. सायंकाळी ६ नंतर कोणालाही अटक करण्यात आलेलं नाही. काही व्हिडीओमध्ये जे दुकानांची तोडफोड करताना दिसत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे”, असंही फडणवीसांनी सांगितलं.

‘तो व्यक्ती मनोरुग्ण होता’

“परभणीतील घटनेतील आरोपी हा मनोरुग्ण आहे. त्याच्यावर २०१२ पासून उपचार सुरु आहेत. मात्र, तरीही तो आरोपी खरंच मनोरुग्ण आहे की नाही त्यासाठी ४ डॉक्टरांची समिती नेमण्यात आली होती. त्यांनी त्याची तपासणी केली. दरम्यान, या संपूर्ण घटनेत सर्वसामान्य लोकांचं जवळपास एक कोटी ८९ लाख ५४ हजारांचं नुकसान झालं”, अशी माहिती फडणवीस यांनी सभागृहात सांगितली.

एक पोलीस निरीक्षक निलंबीत

“या घटनेत काहींनी कोंबिंग ऑपरेशन केल्याचा आरोप केला. मात्र, यामध्ये कुठेही कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलेलं नाही. तसेच एक तक्रार दाखल झाली होती की, तेथील पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवी पेक्षा जास्त बळाचा वापर केला. या आरोपानंतर चौकशी केली जाईल, तसेच चौकशी होईपर्यंत पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबीत करण्यात आलं आहे”, असं फडणवीसांनी सांगितलं.

सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला १० लाखांची मदत

या घटनेत पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. यांच्याबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “सोमनाथ सुर्यवंशी हे कायद्याचं शिक्षण घेत होते. त्यांना जाळपोळीच्या घटनेत अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना कोठडीत मारहाण झालेली नाही. त्यांना श्वसनाचा आजार होता असं अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. मात्र, सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून १० लाखांची मदत देण्यात येणार आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis on parbhani band parbhani violance and an aid of 10 lakhs has been announced to the family of somnath suryavanshi gkt