राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानावरुन विरोधी पक्षाकडून सातत्याने शिंदे सरकारवर टीका केली जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादेतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. या दौऱ्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलेबाजी केली आहे. सगळ्यांना मी कामाला लावलं आहे, असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर भाष्य केलं आहे.
“काही लोक बांधावर जातात, ठीक आहे गेले पाहिजेत. शेवटी काम तर करायलाच पाहिजे. सरकारमध्ये असलेल्यांनी आणि बाकी लोकांनी पण…” असे शिंदे यांनी म्हटले आहे. नंदुरबार नगरपरिषद इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात नंदुरबारचा रखडलेला सात कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला आहे. या सोहळ्यात बोलताना शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या कामाची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
“जून, जुलै, ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदतीचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार कोटी जमा करण्यात आले आहेत. ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानाच्या पंचनाम्याचेही आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचं प्रोत्साहन अनुदान सरकारकडून देण्यात येत आहे”, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. सरकारने तीन महिन्यात ७२ निर्णय घेतल्याचं सांगताना ४०० जीआर काढल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
पाहा व्हिडीओ –
सत्तातरांनंतर उद्धव ठाकरेंचा पहिलाच मराठवाडा दौरा
उद्धव ठाकरेंनी औरंगाबादेतील गंगापूर तालुक्यातील पेंढापूर आणि दहेगांवमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची नुकतीच पाहणी केली आहे. “संकटांशी आपल्याला लढायचं आहे. त्यामुळे धीर सोडू नका. सरकारला मदत करण्यासाठी आपण भाग पाडू”, असे आश्वासन यावेळी ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिले होते. त्यानंतर आजच्या नंदुरबार दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सरकारने शेतकऱ्यांना केलेल्या मदतीचा पाढा वाचून दाखवला.