गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. शिंदे गटाच्या आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे ते अपात्र ठरायला हवेत की नाही? या मुद्द्यावर ही सुनावणी पार पडली असून त्यावरचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नेमकं काय घडणार आहे? यावर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानावर मोठी चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच विधानावरून आज मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी टीव्ही ९ शी बोलताना खोचक टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले होते जयंत पाटील?

जयंत पाटील यांनी राज्यातील एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारच्या भवितव्याविषयी सूचक शब्दांत भाष्य केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाचा विरोधात लागला, तर शिंदे सरकार कोसळेल आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल, अशा आशयाचं विधान जयंत पाटील यांनी केलं होतं. या विधानाला अजित पवार, संजय राऊत यांनीही दुजोरा दिला होता. यावर चर्चा सुरू झाली असतानाच दीपक केसरकरांनी मात्र त्यावरून खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

“आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड?” माजी सैनिकाच्या मुलाचा गोपीचंद पडळकरांना सवाल, पुण्यात लावले बॅनर

काय म्हणाले केसरकर?

दीपक केसरकरांनी यासंदर्भात बोलताना अजित पवार आणि जयंत पाटील यांची नावं घेत खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “मी आजपर्यंत समजत होतो की जे लोक उशीरापर्यंत झोपतात, तेच स्वप्नं बघतात. त्यांनाही स्वप्नं पडायची की महाराष्ट्रात बदल होईल. जयंत पाटील तर लवकर उठतात. अजित पवार लवकर उठतात. तेही स्वप्न बघायला लागले तर राजकारणाचं कसं होईल याची मला चिंता वाटतेय”, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

Video: “गेल्या ३५ दिवसांत तर सगळ्या मर्यादा पार…”, जितेंद्र आव्हाडांचं सूचक ट्वीट; ‘तो’ व्हिडिओ शेअर करत थेट मुख्यमंत्र्यांचा केला उल्लेख!

“संजय राऊत काहीही बोलतात”

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर टीका करणाऱ्या संजय राऊतांनाही दीपक केसरकरांनी लक्ष्य केलं आहे. “संजय राऊत काहीही बोलतात. काल सागाची लाकडं चंद्रपुरातून अयोध्येला गेली. त्यांना कधी हे सुचलंही नसतं की सर्वोत्कृष्ट सागवान हे गडचिरोली आणि चंद्रपूरला तयार होतं. ते श्रीरामाच्या सेवेत गेलं पाहिजे असं त्यांना कधी वाटलं नाही. श्रीरामाच्या नावाने राजकारण करायचं पण हिंदुत्वापासून लांब जायचं असं त्यांचं आहे. काल मालेगावात जाऊन त्यांनी काय केलं, हे सगळ्या जनतेनं पाहिलं आहे. त्यामुळे ते फक्त बोलतात, करत काहीही नाही. त्यांनी हिंदुत्व सोडलंय, बाळासाहेबांचे विचार सोडलेत. त्यामुळे त्यांनीच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला उद्धव ठाकरेंना बांधलंय”, असं दीपक केसरकर म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde fraction deepak kesarkar mocks ajit pawar jayant patil sanjay raut pmw