Eknath Shinde : शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापू लागलं आहे. या घटनेनंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून यासंदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाष्य आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री उशीरा माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्याची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांना उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन असते, ती ठाण्यात बघायला मिळाली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा – ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसे कार्यकर्त्यांचा राडा, कारची काच फोडली, शेण व बांगड्या फेकत म्हणाले…

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

“या सगळ्याची सुरुवात राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यात झाली. बीडमध्ये असताना ठाकरे गटाच्या नेत्यांनी ही सुरुवात केली. ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या. ते कुणालाही आवडलेलं नाही. ही महराष्ट्राची संस्कृती आणि परंपराही नाही. शेवटी अॅक्शनला रिअॅक्शन असते, ती ठाण्यात बघायला मिळाली, पण अशा घटनेचं समर्थन होऊ शकत नाही”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

uddhav thackeray convoy attack
फोटो – सोशल मीडिया

“म्हणून ठाकरे गटावर ही वेळ आली…”

“ज्यावेळी आम्ही सरकार स्थापन केलं, तेव्हा आम्हालाही हे सरकार दोन महिन्यात कोसळेल, असं म्हणत होते. मात्र, आज दोन वर्ष झाले, आमचं सरकार टीकून आहे. कारण आम्ही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचारावर चालतो आहे. ज्यांनी बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे विचार सोडले त्यांच्यावर आता अशा परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आली आहे”, अशी प्रतिक्रियाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा – Jitendra Awhad : “महाराष्ट्रात अराजकता माजली आहे”, उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यावरून जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “फक्त एवढेच लक्षात ठेवा…”

मनसेच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला

दरम्यान, शनिवारी रात्री ठाण्यातल्या गडकरी रंगायतन या सभागृहात ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला जात असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शेण फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच जोरदार घोषणाबाजी केली. याशिवाय त्यांच्या ताफ्यातील एका कारची काचही फोडण्यात आली. दरम्यान, पोलीस व ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांना गडकरी रंगायतन सभागृहात नेलं. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी सभागृहातही शिरण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना बाहेर काढलं.