सोलापूर : हिंदू आस्थांचा अवमान, भ्रष्टाचार आणि दहशतवादाचे मूळ काँग्रेस आहे. याच काँग्रेसकडून जातीच्या जनगणनेच्या नावाखाली हिंदूंना एकमेकांत लढवून मुस्लिमांना २७ टक्के आरक्षणातून ६ टक्के आरक्षण देण्याचा मनसुबा रचला जात आहे. वरून पुन्हा दिशाभूल केली जात असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी कर्णिक नगराजवळील लिंगराज वल्याळ मैदानावर आयोजित जाहीर सभेत योगी आदित्यनाथ बोलत होते. गेल्या सोमवारी, २९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेनंतर तिसऱ्याच दिवशी कडव्या हिंदुत्वाचा चेहरा असलेल्या योगी आदित्यनाथ यांची सभा झाली. या सभेतून भाजपने धार्मिक ध्रुवीकरणावर जोर दिल्याचे पाहावयास मिळाले. दुपारच्या तळपत्या उन्हात झालेल्या या सभेस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गुलाबराव पाटील आदींसह हजारोंचा जनसमुदाय हजर होता.

हेही वाचा – शरद पवारच माझे मुख्य प्रचारक – उदयनराजे

योगी आदित्यनाथ यांच्या २२ मिनिटांच्या भाषणाचा मुख्य गाभा धार्मिक ध्रुवीकरणाचाच होता. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर थेट नामोल्लेख टाळत जोरदार टीका केली. केंद्रात गृहमंत्री असताना ज्यांनी हिंदू दहशतवादाचा सर्वप्रथम उल्लेख करून हिंदूंना अवमानित केले होते, त्यांच्याच कुटुंबातील उमेदवार सोलापुरात काँग्रेसकडून मते मागत आहे. त्यांच्यापासून सावध करण्यासाठी आपण सोलापुरात आल्याचे त्यांनी सांगितले. रामनामाची आळवणी करीत हिंदू मतदारांनी एकत्रितपणे भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा – फसव्या प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करा – शरद पवार

अयोध्येत श्री रामलल्लाचे मंदिर उभारण्याची संधी यापूर्वी काँग्रेसलाही होती. परंतु त्यांनी घालवली. त्यांना रामाचे अस्तित्वच मान्य नव्हते. याउलट पंतप्रधान मोदी यांनी दहा वर्षात सब का साथ-सब का विकास, राम मंदिराची उभारणी यासारखे अनेक निर्णय घेतले. राम मंदिराच्या रुपाने राष्ट्र मंदिरच साकारले आहे. हिंदूंच्या एकजूटीने झालेल्या कामामुळे राम मंदिराच्या रूपाने सिद्धी प्राप्त झाली. या हिंदू एकजुटीला आता कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. लोकसभा निवडणुकांच्या आतापर्यंत १९१ जागांवर झालेल्या मतदानातून सर्व ठिकाणी ‘फिर एक बार-मोदी सरकार’चा नारा कृतीत उतरल्याचा दावाही त्यांनी केला. मागील दहा वर्षात मोदी सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचा सामाजिक न्यायाचा विचार आणि बाळासाहेब ठाकरेंच्या ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांपासून प्रेरणा घेऊन कारभार चालविला असून त्यामुळेच देशाच्या कानाकोपऱ्यातून जनतेची ताकद मोदींच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचा दावा त्यांनी केला. योगी आदित्यनाथ यांच्या सभेच्या माध्यमातून भाजपने हिंदुत्वाचा माहोल तयार करण्यासाठी हिंदुत्ववाद फोफावलेल्या शहराच्या पूर्व भागाची निवड केल्याचे दिसून आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress plan to give reservation to muslims by fighting hindus against each other yogi adityanath allegation ssb