विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघात अनेक घडामोडी घडल्या. नवनिर्वाचित अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. दरम्यान, थोरात यांच्या राजीनाम्या विषयी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी सांगितले आहे. आज (१२ फेब्रुवारी) एच के पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
हेही वाचा >>> “…तर त्यांना ठोकणार,” पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपतींचे विधान, म्हणाले…
एच के पाटील काय म्हणाले?
“मी बाळासाहेब थोरात यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. चार दिवसांपूर्वी मी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही भेट घेतली. महाराष्ट्रातील काँग्रेसमधील कलहाबाबत मी खरगे यांना माहिती दिली. बाळासाहेब थोरात यांची नाराजीही मी त्यांना सांगितली. हा काँग्रेस परिवारातील प्रश्न आहे. मी बाळासाहेब थोरात यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. आम्ही यावर लवकरच योग्य तो मार्ग काढू. बाळासाहेब थोरात रायपूरमधील काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित राहतील. तेथे ते मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी बातचित करतील,” असे एच के पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा >>> अजित पवार म्हणाले ‘त्यांनी दारुची दुकानं उघडली,’ आता संदिपान भुमरेंचे जशास तसे उत्तर; म्हणाले ” ते आम्हाला…”
…त्यावर योग्य तो मार्ग काढला जाईल
“हा आमच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा मंजूर करण्याचा प्रश्नच नाही. मी बाळासाहेब थोरात यांना रायपूरमधील अधिवेशनास हजर राहण्याची विनंती केली आहे. आमच्यातील जे काही प्रश्न आहेत, त्यावर योग्य तो मार्ग काढला जाईल,” असे एच के पाटील यांनी स्पष्ट केले. थोरातांचा राजीनामा नामंजूर झाल्याचे एच के पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा >>> तुमची नाराजी दूर झाली का? राजीनाम्यावर बाळासाहेब थोरातांचे पहिल्यांदाच महत्त्वाचे भाष्य; म्हणाले, “माझे काही…”
बाळासाहेब थोरात रायपूरमधील अधिवेशनाला हजेरी लावणार
दरम्यान, बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या रायपूरमधील अधिवेशनास हजेरी लावणार आहेत. यावेळीते काँग्रेसचे अध्यक्ष, सरचिटणीस यांच्यासमोर ते आपले प्रश्न मांडणार आहेत. त्यानंतर बाळासाहेब थोरात काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.