राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सध्या एकमेकांविरोधात वक्तव्यं केली जात आहे. एकीकडे शिवसेना नेते मुख्यमंत्री असतानाही दोन्ही काँग्रेसकडून दुय्यम स्थान दिल्याचा आरोप करत असताना दुसरीकडे काँग्रेस नेते दिल्लीत वरिष्ठांच्या भेटीगाठी घेत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात त्यांच्यात नाराजी असल्याची चर्चा आहे. यादरम्यान काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
“महाराष्ट्रात जे सरकार स्थापन झाले त्याबद्दल उद्धव ठाकरेंचे आभार मानायला हवेत. त्यांनी समान किमान कार्यक्रमाचा स्वीकार केला. महाराष्ट्र कशा पद्दतीने जातीय आणि धर्मवादी शक्तीपासून वाचवला पाहिजे याचं सुरेख उदाहरण आहे. त्यांचा अवलंब ते करत आहेत. ते खूप चांगलं काम करत आहेत,” अशी स्तुती सुशीलकुमार शिंदे यांनी केली.
“उद्धव ठाकरे आजारी असतानाही सातत्य टिकवून आहेत. तिन्ही पक्षांना एकत्र घेऊन चालणं कठीण काम आहे. तिन्ही पक्ष चांगले काम करत आहेत,” असं ते म्हणाले आहेत. राज्य सरकारमधील मंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईवर बोलताना त्यांनी सीबीआय, ईडी यांचा वापर कधी असा झाला होता का? याबद्दल जास्त न बोललेल बरं असं म्हणत जास्त बोलणं टाळलं.
शिवसेनेनंतर आता काँग्रेस आमदारही महाविकास आघाडीत नाराज? थेट सोनिया गांधींशी चर्चा करणार!
काँग्रेस नेते चांगलं काम करत आहेत. सगळ्या बाबतीत त्यांना स्कोप नाही. पण आमचे प्रांताध्यक्ष, वीजमंत्री चांगलं काम करत असून नावं ठेवायला काही जागा नाही असं ते म्हणाले. नेत्यांमध्ये होणाऱ्या टीकेबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, “त्यासाठी समन्वय असण्याची गरज आहे. आमच्याही वेळी तसंच होतं आणि आत्ताही आहे”.
सुशीलकुमार शिंदे यांनी मुलाखतीदरम्यान सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. मात्र गांधी कुटुंबाव्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीने नेतृत्व करण्याच्या मुद्यावर भाष्य करणं टाळलं.
राहुल, प्रियंका यांच्याशी काय चर्चा होते असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आमच्या जेव्हा बैठका होतात त्यावेळी बोलतो. पण गेल्या तीन-चार वर्षात आमची भेट झालेली नाही. कारण मी गेलो नाही. मला सोनिया गांधी आणि राहुल, प्रियंकाही बोलवतात पण आजकाल मी काही उपदेश करण्याच्या भानगडीत पडत नाही. आता नव्या पिढीच्या हातात सगळं सोपवलं आहे”.
“आम्ही जे बोलत असतो ते काँग्रेस अध्यक्षांशी बोलत असतो. बाकीचे सगळे खासदार, कार्यकर्ते यांना बोलून जास्त काही होत नाही. राहुल गांधी, प्रियंका गांधी आमचे नेते आहेत, त्यांच्याशी बोलणं होत असतं,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
“आम्ही सर्वजण गांधी कुटुंबाला स्वीकारणारे आहोत. त्या घराण्यातून आलेल्या लोकांचं नेतृत्व आम्हाला मान्यच आहे. ते कोणी करावं हे कमिटी ठरवेल,” असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. “गांधी घराण्यात सध्या सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका आहेत. या तिघांमुळे घराणं टिकून आहे. त्या घराण्यातून जो विचार येतोय तो काँग्रेसचा आहे. एखाद्या वेळी चूक झाली असेल पण सुधारणा होईल,” असा विश्वास सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
“२०१४ नंतर मोदींसारखा आक्रमकपणे प्रचार करणारा मोदींसारखा नेता देशाला मिळाला. लोक त्यांच्या प्रचाराच्या भाषेमुळे, वकृत्वामुळे लोक वाहवत गेले. त्यामुळे अनेक मोठ्या नेत्यांचा पराभव झाला. पाच वर्षात हे करु, ते करु सांगितलं होतं. मोदींनी सोलापुरातून सैन्यासाठी कपडे घेतले जातील असं सांगितलं होत. मात्र एकही रुपयाचा कपडा घेतला नाही. खोट्या प्रचाराला लोक भुलले आणि आता त्यांना कळू लागलं आहे,” असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
“तरुणांकडे नेतृत्व द्यायचं, बदल करायला सांगायचं असा प्रयत्न करुन पाहिला आणि तिथेच गफलत झाली, असं मला वाटत. मात्र मी पक्षावर अशी थेट टीका करू शकणार नाही. कारण ही प्रक्रिया आहे. आम्ही १० वर्षांची सत्ता भोगल्याने आम्ही इतके सक्रीय नव्हतो. संघटना बांधणी व्हायला हवी होती ते झालं नाही,” अशी कबुली सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.
“एकट्या राहुल गांधींना दोष देणं शक्य नाही. तरुणांच्या हातात दिलं पाहिजे असं सर्वांना वाटत होतं. पक्षात खळखळतं पाणी असलं पाहिजे. लोकांना बदल हवा होता,” असं सुशीलकुमार शिंदेंनी सांगितलं.