बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही. मात्र त्यांनी राजीनामा दिला असेल तर काँग्रेस पक्षाने याबाबत आत्मचिंतन केलं पाहिजे. काँग्रेसच्या दिग्गजांनी याबाबत विचार केला पाहिजे असं आता सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे. सत्यजीत तांबे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी हे वक्तव्य केलं आहे. आता काँग्रेस काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. अशात आता विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. नुकतेच पदवीधर निवडणुकीत विजयी झालेले सत्यजीत तांबे यांनी आता या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.
राजकारणातली नेते मंडळी दिशा द्यायचे आणि लोक ऐकायचे. आता जमाना बदलला आहे. लोकांना जे आवडतं ते करावं लागतं अशी स्थिती आहे. अशा स्थितीत कुणीतरी समाजाला आरसा दाखवला पाहिजे ते निवृत्ती महाराज करत आहेत. बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरचं नाव मोठं केलं तसंच महाराजही करत आहेत असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे. निवृत्ती महाराज यांचं किर्तन आज संगमनेरमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. त्यानिमित्ताने सत्यजीत तांबे यांनी हे वक्तव्य केलं.
विधीमंडळ नेतेपदाचा बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याच्या बातमीमुळे एकच खळबळ माजली आहे. नाना पटोले यांच्या कारभाराला कंटाळून हे पाऊल बाळासाहेब थोरात यांनी उचललं असल्याचं बोललं जातं आहे. आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे. त्याच दिवशी ही बातमी समोर आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत असं म्हणाले की होय बाळासाहेब थोरात यांनी मला हे सांगितलं की त्यांनी राजीनामा दिला आहे पण त्याचसोबत ते असंही म्हणाले की हा आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. त्यावर आपण आत्ता संवाद नको साधुयात त्यामुळे मी पुढे त्यांना फार काही विचारलेलं नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
आज थोरात साहेब इथे नाहीत. पण निवृत्ती महाराजांचं मी आज स्वागत करतो. मी त्यांचे आभार मानतो असंही सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे. संगमनेरचं नाव बाळासाहेब थोरात यांनी मोठं केलं आहे असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त निवृत्तीमहाराजांचं किर्तन आयोजित करण्यात आलं आहे. मात्र आज बाळासाहेब थोरात हे आज संगमनेरमध्ये नाहीत. त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधला.