नागपूर : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवामागे भाजपविरोधी मतांची विभागणी हे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही हाच प्रयोग प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याखेरीज तिसरी आघाडी किंवा स्थानिक प्रबळ उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यास मतविभागणी सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता वर्तवली जाते.

हरियाणात भाजपने बहुमत प्राप्त केले तर विजयाचा आत्मविश्वास बाळगणाऱ्या काँग्रेसला तोंडघशी पडावे लागले. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तोंडावर या निकालांना महत्त्व आहे. बहुजन समाज पक्ष, दलित नेते चंद्रशेखर आझाद यांनी अनेक मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. या शिवाय विविध समाज घटकांचे प्रतिनिधित्व करणारे अपक्ष उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे काँग्रेसचा पारंपरिक मतदार मानला जाणारा दलित, ओबीसी मतांचे विभाजन होऊन त्याचा काँग्रेसला १६ जागांवर फटका बसला असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

हेही वाचा : Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते. मात्र तरीही दोन ते तीन जागा वंचितमुळे झालेल्या मतविभाजनामुळे आघाडीला गमवाव्या लागल्या होत्या. महाराष्ट्रातही या निवडणुकीत मोठ्या संख्येने अपक्ष रिंगणात असावे यादृष्टीने महायुतीचे प्रयत्न असणार आहेत. जागा वाटपात एकमत न झाल्यास सर्वच पक्षात बंडखोरी अटळ आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि सरसकट बांधकाम कामगार किट्सचे वाटप यामुळेही वातावरण बदलू लागले आहे. याला तोंड देण्यासाठी महाविकास आघाडीकडून विशेषत: काँग्रेसकडून कोणती पावले उचलली जातात ते महत्त्वाचे ठरेल.

वंचितची मोर्चेबांधणी

विधानसभेसाठीही वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांनी बौद्ध समाजाला भावनिक आवाहन करतानाच आदिवासी, मुस्लीम व इतर मागासवर्गीयांची मोट बांधणे सुरू केले आहे. या समाजघटकांची मते सरासरी ३० टक्के आहेत. वंचितचा हा प्रयोग यशस्वी झाला तर त्याचा सर्वाधिक फटका महाविकास आघाडी, विशेषत: काँग्रेसला बसू शकतो. वंचितने ९ ऑक्टोबरला १० उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. त्यात सर्व उमेदवार मुस्लीम आहेत.

हेही वाचा : Nana Patole : महाविकास आघाडीत जुंपली? हरियाणातील पराभवानंतर राऊतांची काँग्रेसवर टीका; पटोले एकेरी उल्लेख करत म्हणाले, “वेळ आली की…”

नऊ जागांवर काँग्रेसला फटका

हरियाणात काँग्रेस ९ जागांवर सहा हजारांपेक्षा कमी मतांनी पराभूत झाले. येथे आम आदमी पक्ष, लोकदल, जननायक जनता पक्ष यांनी घेतलेली मते निर्णायक ठरली. हरियाणात भाजप व काँग्रेसला ४० टक्क्यांच्या आसपास मते मिळाली. या चुरशीच्या थेट लढतीत अन्य उमेदवारांची मते निकाल ठरविण्यात निर्णायक ठरली.