विवियाना मॉल येथे प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह १२ जणांना शुक्रवारी ठाणे पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी त्यांना ठाणे न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यामुळे आव्हाड यांच्यासह १२ जणांची आता सुटका होणार आहे. मागील २४ तासांपासून आव्हाडांच्या समर्थनासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर ठाण मांडून होते. आव्हाडांची सुटका होणार असल्याचे वृत्त कळताच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाण्यातील विवियाना मॉल येथे ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा खेळ सोमवारी ( ७ नोव्हेंबर ) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बंद पाडला होता. या घटनेदरम्यान, एका प्रेक्षकाला धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. त्यानंतर प्रेक्षकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे आव्हाड यांच्यासह १०० जणांविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या घटनेनंतर शुक्रवारी आव्हाडांना वर्तकनगर पोलीस ठाण्यात बोलावत अटकेची कारवाई केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह इतर ११ जणांनाही वर्तकनगर पोलिसांनी अटक केली होती.

हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांच्या अटकेवरून एकनाथ शिंदेंची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकीय…”

आव्हाडांच्या अटकेचे वृत्त कळताच, ठाणे, कळवा, मुंब्रा भागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या जमण्यास सुरूवात केली होती. रात्रभर हे कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या बाहेर ठाणं मांडून होते. आव्हाड यांना शनिवारी सकाळी १०.३० वाजता ठाणे न्यायालयात आणण्यात येणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळताच पुन्हा न्यायालयाबाहेर कार्यकर्ते जमण्यास सुरूवात केली होती. या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान, पोलिसांनी न्यायालयाबाहेरील आवारात चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच न्यायालयासमोरील दोन्ही दिशेकडील रस्ता बंद करण्यात आला होता. सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास आव्हाड यांना न्यायालयात आणण्यात आले. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. एल. पाल यांच्या न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या प्रकरणाची सुनावणी ऐकण्यासाठी मोठ्याप्रमाणात वकील उपस्थित होते.

हेही वाचा : “गजानन किर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात…”, संजय राऊतांचं टीकास्र; स्वत:चं दिलं उदाहरण!

सरकारी पक्षातर्फे पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी यावेळी केली. त्यास आव्हाडांच्या वकिलांनी यावर आक्षेप घेत ही अटक बेकायदेशीरपणे आहे. तसेच, नोटीस दिल्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी १२ जणांना अटक केली. पोलिसांनी लावलेले वाढीव कलमही लागू होत नसल्याचे आव्हाड यांच्या वकिलांनी म्हटले. तर आव्हाड यांच्यासह १२ जणांची कोठडी ही पुढील तपासासाठी महत्त्वाची असल्याचे सरकारी पक्षातर्फे सांगण्यात आले. दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर पाल यांनी आव्हाड यांच्यासह १२ जणांना वर्तकनगर पोलीस ठाण्यात सुरक्षित कोठडीत पाठविले होते. आव्हाड वर्तकनगर पोलीस ठाण्यात नेत असताना न्यायालयाबाहेर जमलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पुन्हा सर्व कार्यकर्ते पुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात गेले.

अखेर दुपारी अडीच वाजताच्या सुमारास न्यायाधीशांनी आव्हाड यांच्यासह १२ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आव्हाड यांच्या वकिलांनी तात्काळ जामीनासाठी अर्ज केला. त्यानंतर काहीवेळातच न्यायालयाने सर्व १२ जणांना जामीन मंजूर केला. न्यायालायाने जामीन मंजूर केल्याचे वृत्त कळताच वर्तकनगर येथे पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court granted bail jitendra awhad over har har mahadev cinema controversey in thane ssa