करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयावरुन नाराजी आणि विरोध होत आहे. विद्यार्थी पालकांसह शिक्षकांनीही सरसकट शाळा बंद विरोधात सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. शाळा बंद करण्यापेक्षा नियोजन करून शाळा सुरू ठेवाव्या, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यासंबंधी सरकार निर्णय घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यादरम्यान राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्षा गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “मधील काळात शिक्षणतज्ज्ञ किंवा पालक संघटनांशी चर्चा झाली त्यावेळी आम्हाला पत्रं, निवदेनं प्राप्त झाली. शाळा सुरु झाल्या पाहिजे असं अनेकांचं म्हणणं होतं. पण मधील काळात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याने सरकारने शाळा, महाविद्यायलं सुरु करु नयेत असा निर्णय घेतला होता”.

सरसकट शाळा बंदला शिक्षकांचा विरोध

“तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल तिथे स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार द्यावेत असा मुद्दा मांडण्यात आला. त्यानुसार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तसा प्रस्ताव सादर केला आहे. येत्या सोमवारपासून शाळा सुरु कऱण्याचा विचार करावा असं प्रस्तावात सांगण्यात आलं आहे. स्थानिक पातळीवर आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय घेतला जावा. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवली असून सकारात्मक प्रतिसाद येईल अशी अपेक्षा आहे,” अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली.

“निर्णय आल्यानंतर शाळा सुरु करण्यासंबंधी प्रक्रियेला सुरुवात होईल. स्थानिक परिस्थिती पाहूनच निर्णय व्हावा अशीच आमचीही इच्छा आहे. याशिवाय १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण व्हावं यावर आमचा भर असणार आहे. त्यामुळे शालेय स्तरावर येऊन लसीसकरणाची विनंती केली आहे. तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही लस घेऊनच शाळेत यावं असंही सांगणार आहोत,” असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

प्रस्तावात काय आहे?

“शहर आणि ग्रामीण भागातील पहिली ते १२ वी अशा सर्व शाळांचा उल्लेख प्रस्तावात आहे. तसंच प्री प्रायमरी शिक्षण यांचाही विचार केला आहे. तेथील स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यायचा आहे. करोनाच्या सर्व नियमांचं पालन करुनच शाळा सुरु करायच्या आहेत. त्यांना सर्व नियोजन करावं लागणार आहे. विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण गेलं पाहिजे हेच मुख्य लक्ष्य आहे,” असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. मुलांचं आरोग्य आणि सुरक्षा याकडे लक्ष दिवं जावं असं आवाहन यावेळी त्यांनी केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid omicron maharashtra school education minister varsha gaikwad on school opening maharashtra cm uddhav thackeray sgy