वाई : पंतप्रधान कार्यालयामध्ये राष्ट्रीय सल्लागार असल्याची बतावणी करीत एका व्यावसायिकाची तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. केंद्र शासनाचे मोठे कंत्राट मिळवून देतो असे आमिष त्याला दाखवण्यात आले होते. हा प्रकार डिसेंबर २०१९ ते मार्च २०२२ या कालावधी दरम्यान घडला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काश्मीरा संदीप पवार (वय २९, रा. कोयना सोसायटी, सदर बाजार, सातारा) आणि गणेश गायकवाड (सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर भादवि ४१९, ४२०, ३४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी व्यावसायिक गोरख जगन्नाथ मरळ (वय ४९, रा. सारंग सोसायटी, गवळीवाडा, सहकारनगर,पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी यांनी गोरख मरळ यांची पुण्यामधील विधान भवन या ठिकाणी भेट घेतली. ही महिला पंतप्रधान कार्यालयामध्ये राष्ट्रीय सल्लागार असल्याची बतावणी केली. वेळोवेळी विधान भवन तसेच आरोपी काश्मीरा पवार हिच्या घरी तसेच चांदणी चौकातील टोनी का ढाबा या हॉटेलवर बोलावून घेतले. त्यांना शासकीय कंत्राट मिळवून देतो असे सांगण्यात आले. परंतु कश्मीर पवार हिने मरळ यांना कोणतेही कॉन्ट्रॅक्ट दिले नाही. आणि त्यांची फसवणूक झाली आहे. असे लक्षात आल्यानंतर त्यांनी सातारा पोलिसांकडे धाव घेतली.

आणखी वाचा-महाड येथे एनडीआरएफचे पथक दाखल, अडीच महिने आपत्ती निवारणासाठी तैनात राहणार

सातारा पोलिसांनी उलट मरळ यांच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान उशिरा का होईना, पुणे पोलिसांनी काश्मीरा पवार आणि तिच्या पतीवर गुन्हा दाखल करून, देशात अजूनही कायद्याचे राज्य आहे. हे दाखवून दिले आहे. काश्मीरा पवार व तिचा पती गणेश गायकवाड यांनी सातारा पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील शेकडो लोकांची कोट्यावधीची फसवणूक केल्याची माहिती मिळत आहे. चक्क पंतप्रधान कार्यालयाच्या नावावरच या दांपत्याने कोट्यावधीची फसवणूक केल्यामुळे केंद्र सरकार याप्रकरणी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.