नाशिकमधलं ड्रग्ज प्रकरण आणि ड्रग्जची तस्करी करणारा ललित पाटील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या ललित पाटीलवरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. ड्रग्ज प्रकरणावरून शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, ललित पाटील खटला, ड्रग्ज प्रकरण, अंमली पदार्थांची तस्करी, राज्यातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था या महत्त्वांच्या विषयांकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात शिवसेनेने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी संजय राऊत यांनी ललित पाटील प्रकरणावरून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केले आहेत. या आरोपांना दादा भुसे यांनी उत्तर देताना ललित पाटीलला उद्धव ठाकरे यांनीच शिवसेनेत घेतलं होतं असा गंभीर आरोप केला आहे. दादा भुसे म्हणाले, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, मोर्चा काढण्याचाही अधिकार आहे. त्यावर आमची काही हरकत नाही. पण मोर्चा काढत असताना काही शैक्षणिक संस्थांनी शाळा बंद केल्या. ज्या शिक्षक बांधवांचं ज्ञानदानाचं काम आहे, त्यांना त्यापासून वंचित ठेवून सक्तीने मोर्चात सहभागी व्हायला लावलं. शाळा बंद करून विद्यार्थ्यांना मोर्चात बोलवावं लागलं. मोर्चा यशस्वी करण्यासाठीचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. आम्ही ड्रग्जचं समर्थन करत नाही. ड्रग्ज नाशिकमध्ये, महाराष्ट्रात किंवा संपूर्ण देशात कुठेही असुदे, त्याचं समर्थन नाहीच. यासंदर्भात कोणतीही चौकशी करावी, यामध्ये जो कोणी दोषी असेल, पालकमंत्री दोषी असेल तर त्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम्ही यापूर्वीच केली आहे. दादा भुसे म्हणाले, संजय राऊत हे शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्राचे नेते असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव ठाकरे यांनी ललित पाटीलच्या हातावर शिवबंधन बांधून त्याला शिवसेनेत प्रवेश दिला होता. त्यामुळे त्याच्याकडू कोणाला हप्ते मिळत होते हे पोलीस तपासात समोर येईल. नाशिकचे पालकमंत्री म्हणाले, मालेगावात गेल्या १०-१२ वर्षापूर्वी कुत्ता गोळी प्रकार आला. या व्यसनापासून लोकांना दूर केलं पाहिजे म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. परंतु, यांची दुखणी वेगळी आहेत. ही दुखणी त्यांना सहनही होत नाहीत आणि सांगताही येत नाहीत. त्यांची दुखणी आपण लवकरच जनतेसमोर आणणार आहोत. माझं मालेगावच्या जनतेशी उत्तरदायित्व आहे. त्यांचा विश्वास माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. संजय राऊत आजही संपर्क प्रमुख आहेत. दरम्यान, दादा भुसे यांनी, ललित पाटील काल-परवा जन्माला आलाय का? संजय राऊत दर महिन्याला इथे येऊन काय करायचे? एक्सप्रेस इनमध्ये काय चालायचं? असे अनेक प्रश्न उपस्थित केले. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते. हे ही वाचा >> बारामती लोकसभेसाठी राज ठाकरेंकडून मोर्चेबांधणी, रोहित पवार म्हणाले, “मतं फोडण्यापेक्षा…” शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांवरही दादा भुसे यांनी उत्तर दिलं. भुसे म्हणाले, सुषमा अंधारे यांच्या शंकांचं निरसन झालं आहे. त्यांच्या अजून काही शंका असतील तर कायद्याच्या चौकटीत आम्ही त्यांना उत्तर देणार आहोत. परंतु, ठाकरे गटाला गर्दी जमवण्यासाठी शाळा बंद कराव्या लागतात. विद्यार्थ्यांना वेठीस धरून त्यांना आंदोलनाला आणलं. या गोष्टीदेखील सर्वांच्या समोर येतील.