जि.प. व पं.स. निवडणूक ‘तिरंगी’

दापोलीत पंचायत समितीच्या १२ जागांसाठी एकूण ५४, तर जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी ३० उमेदवार निवडणूक िरगणात असून यंदा प्रथमच शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप अशी तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये अनेक ठिकाणी शिवसेनेतील दळवी समर्थक भाजप किंवा राष्ट्रवादीच्या बाजूने उभे राहण्याचे संकेत असल्याने शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला नवे आव्हान निर्माण झाले आहे.

शिवसेना, भाजप तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी हे चारही पक्ष यंदा प्रथमच जिप व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवत आहेत. दापोली नगराध्यक्ष निवडणुकीत झालेली शिवसेना, काँग्रेसची युती आणि राष्ट्रवादीने भाजपला दाखवलेली अनुकूलता या पाश्र्वभूमीवर दापोलीत नवे राजकीय समीकरण मांडण्यात येत होते. त्यातच पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यात वर्चस्वासाठी संघर्ष झाल्यानंतर ‘मातोश्री’वरून दापोलीची सूत्रे कदम यांच्याकडे देण्यात आली. त्यामुळे दळवी समर्थकांत नाराजी निर्माण झाली. त्यातूनच माजी पंचायत समिती सभापती स्मिता जावकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शांताराम जाधव यांनी तातडीने भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक िरगणात उडी घेतली. याव्यतिरिक्त उमेदवार यादीतून वगळण्यात आलेले दळवी समर्थकही भाजप आणि राष्ट्रवादीला मदत करण्यासाठी पुढे सरसावले. माजी आमदार दळवी यांच्या विरोधकांना रामदास कदम यांनी संघटनेत मुख्य पद दिल्याने आता तेही दळवी समर्थकांना कितपत पक्षाच्या प्रवाहात आणतील, याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त होत आहे.

दुसऱ्या बाजूला कुणबी समाजाच्या बहुजन विकास आघाडीने सुरुवातीला राष्ट्रवादीबरोबर निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. पण त्यांच्यातील वाटाघाटींना मूर्त स्वरूप येऊ शकले नाही. त्यामुळे आता तालुक्यातील कुणबीबहुल विभागात पक्षाच्या ‘शिटी’ या चिन्हावर शिक्का मारण्याची सवय मतदारांमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत याच बहुजन विकास आघाडीने तब्बल २१ हजार मते स्वत:च्या पारडय़ात पाडत राष्ट्रवादीचा विजय सुकर केला होता. या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत त्याची पुन:प्रचीती येण्याची शक्यता धूसर असली तरी मतदार व विरोधकांची दिशाभूल करण्याचाच हेतू अशा राजकीय खेळीतून दिसत असल्याचा अंदाज राजकीय निरीक्षकांत व्यक्त होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या निवडणुकीत सर्वात जास्त फायदा भाजपला होणार असून त्यांची ताकद अपेक्षेपेक्षा अधिक वाढण्याचे स्पष्ट संकेत आहे. त्यात स्मिता जावकर आणि केदार साठे यांनी अमुक्रमे बुरोंडी व हर्णे जिप गटात विरोधकांसमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. तर अडखळमध्ये शांताराम जाधव यांच्या रूपाने ते जोरदार मुसंडी मारण्याच्या विचारात आहेत. आता दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीनेदेखील मुजीब रुमाणे यांना असोंड जिप गटातून उमेदवारी देत काँग्रेसची मिणमिणती आशाही विझवून टाकली आहे. तसेच अनेक विभागात राष्ट्रवादी शिवसेनेतील नाराजांना कसे हाताळतात, याकडेच सर्वाचे लक्ष आहे.