सोलापूर : सोलापूरसाठी वरदान समजल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा केवळ नियोजनशून्य जल व्यवस्थापनामुळे झपाट्याने खालावला असून आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा विचार करता धरणात पुणे जिल्ह्यातून दहा टीएमसी पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे. परंतु ही मागणी धुडकावून लावत उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील वरच्या धरणांतूनही पाणी सोडता येणे शक्य नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात उन्हाळ्याची तीव्रता वाढेल, तसे उजनीचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या सोलापुरात उन्हाचे चटके बसायला सुरूवात झाली असून सध्या ३५ अंश सेल्सियसपर्यंत तापमान वाढले आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह ४० मंडळांमध्ये शासनाने यापूर्वीच दुष्काळ घोषित केला आहे.

हेही वाचा >>> प्रतीक्षा संपली… शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध! सर्वाधिक जागा जिल्हा परिषद शाळांमध्ये 

दुसरीकडे उजनी धरणात गेल्या १५ आॕक्टोंबरअखेर सर्वाधिक झालेला ६०.६६ टक्के (३३.५० टीएमसी) पाणीसाठा पंधरा दिवसांपूर्वीच संपला असून आजअखेर धरणात उणे नऊ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा खालावला आहे. उजनी पाणी नियोजन करताना चालू महिनाअखेर  वजा १४.९५ टीएमसी म्हणजे वजा २७.९० टक्के पाणीसाठा गृहीत धरण्यात आला होता. प्रत्यक्षात त्याहून जास्त प्रमाणात पाणीसाठा खालावण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात तग धरण्यासाठी उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील धरणांतून दहा टीएमसी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. या  मागणीसाठी भिगवण येथे करमाळा व इंदापूर तालुक्यातील धरणग्रस्तांसह शेतक-यांचे ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू झाले होते.

उपमुख्यमंत्री पवार यांनी उजनी धरणाच्या पाणी नियोजनाच्या नियोजनशून्य कार्यपध्दतीवर तीव्र नापसंती व्यक्त करताना कालवा सल्लागार समितीला फटकारले होते. परंतु कालवा सल्लागार समितीवर अजित पवार यांचे अनुयायी असलेले बडे साखर कारखानदार लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी प्रशासनावर दबाव टाकून धरणातील पाणी फस्त केले आहे. त्यांच्या विरोधात पवार यांनी कठोर कारवाई करून दाखवावी. नियम धाब्यावर बसवून धरणातून पाणी सोडण्यासाठी प्रशासनाला भाग पाडणा-या लोकप्रतिनिधींनी आता आपले तोंड उघडावे, असे आव्हान करमाळा तालुका उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजी बंडगर यांनी दिले आहे. 

हेही वाचा >>> “ओबीसी समाज थोडा अशिक्षित आणि अल्पसंख्यांक असल्याने…”, जितेंद्र आव्हाडांची भुजबळांवर टीका

काही वर्षांपूर्वी उजनी धरणात पुणे जिल्ह्यातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांनी आंदोलन केले होते. परंतु अजित पवार यांनी त्या आंदोलनाची खिल्ली उडवत उजनी धरणात पाणी सोडण्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे ते स्वतः अडचणीत आले होते. त्यांच्यावर माफी मागण्याची नामुष्की ओढवली होती. या पार्श्वभूमीवर प्रभाकर देशमुख यांनी आता पुन्हा पाणी प्रश्नावर उपोषणाचा इशारा दिला आहे.

पाणी वाटप नियोजन चुकीचे

एकीकडे जगभर खोरेनिहाय जलव्यवस्थापन होत असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फाडणावीस यांनीही राज्य एकत्रित जल आराखड्याला मंजुरी दिली होती. परंतु त्याची कृती होत नाही. भीमा नदी खो-यात खोरेनिहायऐवजी धरणनिहाय पाणीवाटप होते. ही चुकीची पध्दती बंद झाल्यास उजनी धरणाच्या पाणी प्रश्नासाठी वाद होणार नाही. –अनिल पाटील, जलतज्ज्ञ, माढा

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm ajit pawar clarified not possible to release water from dams in pune to in ujani dam zws
Show comments