राज्यात १९ जूनपासून सार्वत्रिक पोलीस भरती सुरू झालेली आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात १७ हजार ४७१ पदांसाठी ही पोलीस भरती प्रकिया पार पडत आहे. या भरती प्रकियेसाठी सध्या उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी पावसामुळे उमेदवारांच्या मैदानी चाचणीला अडचणी येत आहेत. पावसामुळे पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी मैदान सुस्थितीत राहत नाही. त्यामुळे त्याचा मैदानी चाचणीवर परिणाम होत असल्याचं काही उमेदवारांचं म्हणण आहे. याबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. ‘ज्या ठिकाणी पाऊस आहे. असा ठिकाणच्या उमेदवारांच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत’, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, ज्या ठिकाणी पाऊस आहे. त्या ठिकाणच्या उमेदवारांच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. आता यापुढे अजून पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचण्या आणखी पुढे गेल्या तर अनेक उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होतो. मात्र, त्या उमेदवाराला ती संधी मिळायला हवी”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : सांगली: जमीन नोंदीसाठी १० हजाराची लाच घेताना तलाठ्याला अटक

“राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, ज्या ठिकाणी पावसामुळे व्यत्यय निर्माण झाला असेल त्या ठिकाणच्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी घेण्यासाठी पुढच्या तारखा देण्यात आलेल्या आहेत. मात्र, ज्या जिल्ह्यात पाऊस नाही तेथे भरती प्रक्रिया राबण्यात येत आहे. तसेच जे विद्यार्थी मैदानी चाचणीसाठी येत आहेत, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात आम्ही सूचना केलेल्या आहेत”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी केलं होतं आंदोलन

पोलीस भरतीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. मात्र, अनेक ठिकाणी पाऊस पडत असल्यामुळे मैदानावर पाणी साचत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्याना मैदानी चाचणीसाठी अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. अमरावतीत काही विद्यार्थ्यांनी आक्रमक होत आंदोलन केलं होतं. तसेच पोलीस भरती पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र, त्या पार्श्वभूमीवर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. “ज्या ठिकाणी पाऊस आहे. त्या ठिकाणची पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आली असून त्यासाठी पुढच्या तारखा देण्यात येतील”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.