आज परळीत आल्यावर दोन महत्त्वाच्या नाथांचं दर्शन आम्ही घेतलं. परळी वैजनाथांचं दर्शन आम्ही घेतलं. तसंच ज्यांच्या उर्जेमुळे राजकारणात आम्ही आहोत त्या गोपीनाथाचं दर्शन आम्ही घेतलं. परळी वैजनाथाच्या चरणी नतमस्तक होताना मी गोपीनाथ मुंडे यांनाही अभिवादन करतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. खरं म्हणजे धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी एक मिरवणूक ठेवली होती. ती मिरवणूक काढली असती तर संध्याकाळपर्यंत कार्यक्रम झाला नसता कारण तुमचं दर्शन आम्हाला झालं नसतं, असं म्हणत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना एक महत्त्वाची विनंतीही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

आज मराठवाडा संकटात आहे. बीड जिल्हाही संकटात आहे. मोठ्या प्रमाणात दुष्काळाची छाया आहे. अनेक तालुक्यांमध्ये पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. मात्र मला एका गोष्टीचं समाधान आहे की आपण निर्णय केला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात एक रूपयात पिक वीमा योजना जाहीर केली. या जिल्ह्यात १८ लाख शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम त्यांच्या खात्यात मिळाली. हा वीमा सर्वांना मिळाला पाहिजे यासाठी धनंजय मुंडेंनी प्रयत्न केले. तसंच दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना एकनाथ शिंदे सरकार पूर्णपणे मदत करेल. कुठल्याही शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नानाजी देशमुख कृषी योजनाचा दुसरा टप्पा

नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेचा दुसरा टप्पा आपण सुरु केला. प्रत्येकाला शेत तळं, शेततळ्याला अस्तर, शेतमालाला भाव देण्याची योजना, प्रक्रिया केंद्रं या सगळ्या गोष्टी आपण सुरु केल्या आहेत. आमच्या शेतकऱ्याला स्थैर्य यावं आणि त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सोयाबीन, कापूस यांचा भाव वाढला पाहिजे यासाठी केंद्राशीही बोलणी सुरु आहेत. मला आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. आम्हाला दिवसा १२ तास वीज द्या ही शेतकऱ्यांची मागणी असते. आपण वर्षानुवर्षे शेतकऱ्याला रात्री आणि दिवसा वीज देतो. मात्र आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु केली. या योजनेच्या अंतर्गत दिवसा १२ तास अखंडित वीज देण्याचा निर्णय आपण घेतला आहे.

महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत

पंकजा मुंडे यांनी माझी लेक भाग्यश्री योजना सुरु केली होती. त्याचा पुढचा टप्पा आपण सुरु केला आहे. ज्या घरात मुलगी जन्माला येईल ते घर लखपती करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. आमच्या माता-भगिनींनी आणखी एका निर्णयाचं स्वागत केलं आहे. ५० टक्के तिकिट दरांमध्ये एसटीचा प्रवास सुरु केला आहे. आता तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही सांगू शकता तुम्ही घरी बसा मी जाऊन येते कारण मी जाऊन आले तर एसटीला अर्धच तिकिट लागतं. असं म्हणत या योजनेची आठवणही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात करुन दिली.

आम्ही तिघं एकत्र आल्याने काही लोकांना पोटदुखी

महाराष्ट्रात मोदी आवास योजनाही आपण सुरू केली आहेत. दहा लाख घरं ओबीसींकरता बांधण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. आमच्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या मानधनात १५०० ते १७०० रुपये वाढ या सरकारने केली आहे. निराधारांना १ हजार ऐवजी १५०० रुपये पेन्शन करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात गेल्या दीड वर्षात जी कामं केली ती यादी वाचली तर ती ती यादी वाचताना वेळ कमी पडेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आम्ही तिघं एकत्र आलो आहोत. आमच्या मनात एकच ध्यास आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा विकास. काही लोकांना ते नको आहे त्यामुळे काही जण रोज बेताल वक्तव्य करतात. त्याकडे आम्ही लक्षही देत नाही. आम्ही ज्या राज्यांमध्ये प्रचाराला गेलो तिथे चांगला विजय मिळाला. त्याचीही पोटदुखी काही लोकांना आहे. ते विचारतात तुम्ही शेजारच्या राज्यात का गेले? तुम्हाला शेजारच्या घरात कुणी बोलवत नाही आम्हाला राज्यात बोलवतात. पुढच्या वेळी तर अजित पवारांनाही घेऊन जाणार आहोत. तरीही आमचं लक्ष महाराष्ट्राकडेच आहे.

पंकजा आणि धनंजय मुंडेंना एकच विनंती आहे की

मगाशी पंकजा मुंडे म्हणाल्या की आज या स्टेजवर पंकजा मुंडे आहेत आणि धनंजय मुंडेही आहेत. मी दोघांना एकच विनंती करेन तुम्ही दोघे असेच एका स्टेजवर राहा. यांना आज सांगू इच्छितो की तुम्ही दोघंही एकत्र राहा. आमच्या तिघांची ताकद तुमच्या पाठिशी अशी उभी करु की परळी किंवा बीड असेल काहीही पाहायची आवश्यकता नाही. तुम्ही एकत्र राहिलात तर परळी आणि बीडचं कल्याण होईल तसंच महाराष्ट्राचंही कल्याण होईल.