राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी आज राज्य सरकारच्यावतीने सर्वपक्षीय बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. आरक्षणाच्या मुद्यांवर विधानसभेत चर्चा व्हावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती. पण ही मागणी सरकारकडून मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. आता सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. “आपली राजकीय जात कुठली? हे दाखवण्याचा विरोधकांचा हा प्रयत्न आहे”, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“मराठा आरक्षणासारख्या महत्वपूर्ण मुद्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला. मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलण्यासाठी त्यांना वेळ नाही. पण विजय वडेट्टीवार यांच्या घरी बसून महाविकास आघाडीचे नेते निवडणुकीची बैठक करत आहेत. त्यासाठी त्यांना वेळ आहे. त्यामुळे एक प्रकारे आपली राजकीय जात कुठली? हेच दाखवण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीक केली.

हेही वाचा : ‘तुम्ही कितीही डाव टाका, पण जामनेरमध्ये…’, मनोज जरांगेंचा गिरीश महाजनांना इशारा

फडणवीस पुढे म्हणाले, “ज्यावेळी महाराष्ट्रात समाजासमाजात तेढ निर्माण झाला आहे. ज्यावेळी वेगवेगळे समाज एकमेकांसमोर उभे येतात. त्यावेळी सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन मार्ग शोधले पाहिजेत. अशा प्रकारची एक परंपरा असताना केवळ राजकीय फायद्यासाठी दोन्हीही समाजामध्ये खोट बोलायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायची अशा प्रकारच्या मानसिकतेमधून विरोधी पक्षाने या बैठकीवर बहिष्कार घातला. याचा अर्थ त्यांच्यामते कोणताच समाज महत्वाचा नाही. त्यांच्यासाठी सत्ता आणि निवडणुकाच महत्वाच्या आहेत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

“या बैठकीत विविध पक्षांच्या नेत्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी एक सूचना मांडली आहे की, सर्व राजकीय पक्षांची आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका काय? हे लेखी दिलं पाहिजे. प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट करावी. दुटप्पी भूमिका ठेवू नये. अशा प्रकारचा प्रस्ताव मांडलेला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील. आजच्या बैठकीचा उद्धेश हाच आहे की महाराष्ट्रात जातीय सलोखा राहिला पाहिजे. विविध समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत. या संदर्भात समाज हिताचा निर्णय घेऊनच आम्ही पुढे जाऊ”, असं फडणवीस म्हणाले.

“शरद पवार या बैठकीला येतील किंवा त्यांचे प्रतिनिधी येतील, असं वाटलं होतं. मात्र, तेही आले नाहीत. पण आजचा जो सर्व प्रकार आहे, तो जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटत राहिला पाहिजे आणि पेटत्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भाजता आली पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न विरोधी पक्षाचा आहे”, असा आरोप फडणवीस यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis on mahavikas aghadi and maratha and obc reservation gkt
Show comments